मुंबई / अजेयकुमार जाधव
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अंत्ययात्रा बघून सर्वाना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापारीनिर्वानाची आठवण झाली. डॉ. आंबेडकर यांच्या महापारीनिर्वानानंतर आता पर्यंत कोणाचीही इतकी मोठी अंत्ययात्रा निघाली नव्हती अशी प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त केली जात आहे.
सकाळी नऊ वाजता बाळासाहेबांचं पार्थिव ' मातोश्री ' बाहेर आणण्यात आलं. बाळासाहेबांचं पार्थिव भगव्या वस्त्रात लपेटलेलं असून, त्यांची ओळख ठरलेला गॉगल त्यांच्या डोळ्यांवर ठेवण्यात आलाय. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेना-भाजपचे प्रमुख नेते पार्थिवासोबत आहेत. बाळासाहेबांवर शासकीय इतमामात अंत्यंस्कार होणार असल्यानं ' मातोश्री ' बाहेर पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. त्यांचं पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात आलं आणि एका खुल्या वाहनातून बाळासाहेबांची अंत्ययात्रा निघाली.
बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेसाठी फुलांनी सजवलेल्या खुल्या वाहनावर, त्यांच्या पार्थिवाशेजारी, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, जयदेव ठाकरे, आदित्य, तेजस, राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदाताई, स्मिता ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि इतर नेतेमंडळी आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो शिवसैनिक महायात्रेत सहभागी झालेत. बाळासाहेबांचा चेहरा दिसावा, त्यांना हात जोडून वंदन करता यावं आणि आपल्या 'दैवता ' चं रूप मनात साठवून ठेवता यावं यासाठी सा-यांचेच डोळे आसुसलेत.
बाळासाहेबांचं पार्थिव असलेल्या वाहनापुढेही त्यांच्या चाहत्यांचा अथांग प्रवाह दिसत होता. त्यामुळे महायात्रेचा वेग मंदावला. महायात्रेच्या मार्गावरील प्रत्येक इमारतीची प्रत्येक खिडकी आणि गच्ची पॅक होती. इतकंच नव्हे तर, दुकानांच्या शेडवर, पत्र्यांवरही तरुण उभे होते आणि बाळासाहेबांचं दर्शन घ्यायचा प्रयत्न करत होते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तब्बल ५० हजार पोलीस रस्त्यांवर पहारा देत होते.
शिवसेनाप्रमुखांच्या अंत्ययात्रेत सर्व ठाकरे कुटुंबीय बाळासाहेबांच्या पार्थिवासोबत असताना, राज ठाकरे या महायात्रेत आपल्या समर्थकांसोबत चालत आहेत. शिवाजी पार्कवरील सर्व व्यवस्थेचा आढावा घेऊन ते सकाळी आठ वाजता ' मातोश्री ' वर पोहोचले. त्यानंतर नऊच्या सुमारास ते ' मातोश्री ' बाहेर आले आणि पोलिसांशी, मिलिंद नार्वेकरांशी चर्चा करून चालतच सेनाभवनाच्या दिशेनं निघाले. आपल्या सहका-यांसोबत खाली मान घालून ते शांतपणे चालत होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. राज ठाकरे बाळासाहेबांच्या पार्थिवासोबत का नव्हते, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या महाअंत्ययात्रेत पायी चालत सहभागी झालेले राज ठाकरे यांनी दादरमध्ये शिरल्यानंतर आपल्या घरची, ' कृष्णकुंज ' ची वाट धरली आणि सारेच चक्रावले. शिवाजी पार्कमध्ये जाण्याआधी बाळासाहेबांचं पार्थिव शिवसेना भवनात नेलं जाणार आहे. पण तिथे न थांबता राज घरी गेले. त्यांच्यासोबत त्यांचे समर्थकही कृष्णकुंजकडे वळलेत. शिवसेना भवनात जाऊन नवी चर्चा, नवा वाद निर्माण करण्याऐवजी राज ठाकरे थेट शिवाजी पार्कवरच जाणार असल्याचं सूत्रांकडून समजतं.