मुंबई । प्रतिनिधी - बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात आहे. बेस्टवर करोडोंचे कर्ज आहे. अश्या परिस्थिती कामगारांचे पगार वेळेवर होत नाहीत. अश्या परिस्थितीत बेस्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पदावरही कुऱ्हाड पडणार आहे. बेस्ट उपक्रमामधील तब्बल ४८९४ पदे रद्द करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने बेस्ट समातीच्या मंजुरीसाठी पाठवला आहे.
बेस्ट उपक्रमावर करोडो रुपयांचे कर्ज असून दैनंदिन जीवन चालवायला बेस्टला विविध बँकांचे कर्ज घ्यावे लागत आहे. बेस्टने सन २०१७-१८ चा ५६० कोटी तर सन २०१८-१९ चा ८९० कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. बेस्टला आर्थिक मदत मिळावी म्हणून पालिकेकडे मदत मागितली जात आहे. बेस्टला मदत करण्यापूर्वी पालिका आयुक्तांनी बेस्टमध्ये सुधारणा करण्यास सांगितली आहे. या नुसार कामगारांचे भत्ते गोठवणे, कामगारांची पदे न भरणे, बेस्ट ताफा आणि प्रवाशांच्या भाड्यात सुधारणा केली जाणार आहे.
बेस्टमधील बसचा ताफा कमी केला जात आहे. एकेकाळी बसचा ताफा ४४५० होता. सध्या ३५०० बसचा ताफा आहे हा ताफा आणखी कमी करून ३३०० च्या आसपास आणला जाणार आहे. तसेच बेस्टमध्ये भाडेतत्वावर बसेस घेतल्या जाणार आहे. यामुळे बेस्टमधील अधिकारी आणि कामगारांची ४८९४ पदे रद्द केली जाणार आहेत. बेस्टमधील ७३३४ पदे रद्द केली जाणार होती. मात्र सुहास सामंत यांनी केलेल्या उपसूचनेनंतर २४१० पदे या पदांमधून वगळण्यात आली आहेत.
बेस्ट उपक्रमातील सुरक्षा व दक्षता विभागातील १७९, स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील ७९, विद्युत पुरवठा विभागातील ३९४, परिवहन अभियांत्रिकी विभागातील ८७५, तर वाहतूक विभागातील ३३६७ पदे रद्द केली जाणार आहेत. रद्द केल्या जाणाऱ्या पदांमध्ये बसचालकांची १५९५, वाहकांची १६५७, स्वच्छकांची ३००, मॅकेनिकची ३०८, जोडारी १५३, नवघाणी २५० पदांचा समावेश आहे. याबाबतचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या पुढील बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.