मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिका शिक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करत असली तरी शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे. शिक्षण विभागातील गैरसोयींवर सतत टिका होत असताना त्यात आता ५०४ बालवाड्यांची भर पडली आहे. या बालवाड्यांची तपशीलवार माहिती द्या, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी प्रशासनाला दिले.
पालिका शाळांत ५०४ बालवाड्यांची कागदोपत्री नोंद आहे. मात्र अनेक बालवाड्यांत मुले येत नाहीत. काही शाळांत शिक्षकच नाहीत. बॅंचेस अभावी मुलांना जमिनीवर बसावे लागत आहे. त्यामुळे ५०४ बालवाड्या नेमक्या कोणत्या ठिकाणी आहेत. त्यात किती मुले नियमित येतात, किती शाळांत शिक्षक नाहीत. तसेच ज्या संस्थांनी बालवाड्या चालविण्यास असमर्थता दर्शवली आहे, त्याचे कारणे द्या, अशी मागणी भाजपचे पालिका गटनेते मनोज कोटक यांनी केली. आपल्या पाल्याला एकदा पहिलीला शाळेत घातले कि त्याने त्याच शाळेतून १० पर्यंतचे शिक्षण घ्यावे. चार चार वेळेस त्याला शाळा बदलावी लागू नये, यासाठी सलग पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण देता येईल, यास्वरुपाचे धोरण पालिकेने तयार करावे. एकीकडे बालवाड्या चालविण्यास संस्था नकार देत असताना दुसरीकडे शिक्षण विभागाकडून ३९६ बालवाड्या सुरु करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी मांडण्यात आला. यावरुन स्थायी समितीने प्रशासनालाचा चांगलेच धारेवर धरले. शिक्षकांना आणि मदतनिसांना दिले जाणार मानधन कमी आहे. इतक्या कमी मानधनात कोण येणार, या संस्थांमार्फत ज्या ५०४ बालवाड्या चालविण्यात येत आहेत त्याबद्दल गेल्या चार वर्षांपासून माहिती मागवत आहे. परंतु त्या कोणत्या ठिकाणी चालण्यात येतात, याची माहिती मिळाली नाही. या बालवाड्या का चालत नाही त्याचा तपशील द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांनी केली.