मुंबई | प्रतिनिधी - मुंबई महापालिकेत सल्लागारांचे मंडळ स्थापन करून त्यांच्या देखरेखीखाली मुंबईतील रस्ते मागील २०१४ पासून तयार केले जात आहेत. या कालावधीत केलेल्या रस्त्यांच्या बांधकामांमध्ये मोठया प्रमाणात घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. रस्त्यांच्या कामात घोटाळा झाल्याचे उघड झाल्यानंतर पुन्हा याच सल्लागाराची पालिकेने निवड केली आहे. दीड वर्षापूर्वी रस्ते कामांतील घोटाऴा उघ़डकीस आला. तेव्हा रस्ते बांधकामांची कामे य़ाच सल्लागारांच्या देखरेखीखाली झाल्याची प्रकरणे समोर आली. इतकच नाही तर सल्लागारांनी बनवलेल्या आराखड्यानंतरही स्थायी समितीने मंजूर केलेल्या अनेक रस्त्यांची कामे वगळण्यात आली होती. अशा सल्लागारांवर महापालिकेने पुन्हा विश्वास टाकला आहे. रस्त्यांच्या डांबर आणि सिमेंट क्रॉक्रिटीकरणासाठी पुढील तीन वर्षांसाठी पुन्हा जुन्या पाच सल्लागार कंपन्यांचीच निवड प्रशासनाने केली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी यापूर्वी सल्लागारांविरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे आता या पाच सल्लागारांना महापालिकेत पुन्हा स्थान देणार का? यावर आता सर्वांचे लक्ष आहे.
मुंबईतील डांबरी, सिमेंट कॉक्रीट रस्त्यांची सुधारणा, दुरुस्ती, व संकल्पचित्रे तसेच अंदाजपत्रके तयार करण्यासाठी पुढील तीन वर्षांसाठी सल्लागारांची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी श्रीखंडे प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स टेक्नोजेम कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स कन्स्टुमा कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स प्रोजेक्ट कन्सल्टिंग इंडिया व मेसर्स टंडन अर्बन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या पाच सल्लागारांची निवड करून त्यांचे एक सल्लागार मंडळ तयार करण्यात आले आहे. या सल्लागारांच्या माध्यमातून पर्जन्य व मलवाहिनी विभागाचे अभिप्राय घेणे, टोपोग्राफी सर्व्हे, चाचणी खड्डे घेणे, भूचाचणी करणे, सविस्तर मोजमापे घेऊन महापालिकेच्या दरानुसार रस्ते व संबंधित बांधकामांचे अंदाजपत्र व संकल्पचित्र बनवणे, फरसबंदी, पदपथ यांचे जाळे सशक्त करणे, वाहनांचे सर्व्हेक्षण करणे आदी प्रकारची कामे केली जाणार आहेत. ज्या सल्लागारांचे मंडळ स्थापन करून ज्यांच्याकडून सल्लासेवा घेतली जाणार आहे, त्याच सल्लागारांच्या देखरेखीखाली मुंबईतील रस्ते मागील २०१४ सालापासून तयार केले जात आहेत. याच कालावधीत केलेल्या रस्त्यांच्या बांधकामांमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघडही झाले आहे. मात्र, तरीही त्याच सल्लागारांवर महापालिकेच्या वतीने पुन्हा मेहेरबानी दाखवली जात असल्याचा आरोप केला जातो आहे. त्यामुळे यावर स्थायी समितीत य़ाला विरोध होण्याची शक्यता आहे.