मुंबई । अजेयकुमार जाधव -
मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त स्थायी समितीमधील आपल्या वागण्याने भलत्याच चर्चेत आल्या आहेत. मागील स्थायी समितीच्या बैठकीत चक्क डुलक्या घेणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांनी बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत साकीनाक्यातील आगीच्या घटनेमधील मृतांच्या आकड्यावरून गोंधळ घातला. यामुळे पालिका मुख्यालयात खळबळ माजली असून मृतांबाबत चुकीचा आकडा प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध होणार असल्याने पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पद हे आयुक्तांच्या नंतरचे महत्वाचे पद मानले जात असल्याने या पदावर जबाबदार अधिकाऱ्यांना बसविले जाते. अश्या जबाबदार अधिकाऱ्यांना स्थायी समिती, वैधानिक समित्या व पालिका सभागृहात नगरसेवकांच्या प्रश्नाला उत्तरे देण्यासाठी व पालिका प्रशासनाची बाजू मांडण्यासाठी पाठविले जाते. मुंबई महानगरपालिकेत आयुक्तांच्या नंतर चार अतिरिक्त आयुक्त आहेत. यापैकी महिला अधिकारी असलेल्या आय. ए. कुंदन आपल्या स्थायी समितीमधील वागण्यावरून चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. स्थायी समितीच्या १३ डिसेंबरच्या बैठकीत आय. ए. कुंदन या चक्क डुलक्या घेत होत्या. यावेळी स्थायी समितीत पश्चिम उपनगरील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत २१८ कोटी रुपयांचे १२ प्रस्तावावर चर्चा सुरु होती. चर्चा सुरु असताना अतिरिक्त आयुक्त डुलक्या घेत आहेत हे स्थायी समितीच्या सदस्यांनी बघितले मात्र त्यावेळी आपण बोलता असताना अतिरिक्त आयुक्त झोपल्या असत्या किंवा डुलक्या काढल्या असत्या तर आम्ही हरकत घेतली असती असे बोलून काही नगरसेवकांनी कुंदन यांचा बचाव केला होता.
हे प्रकरण ताजे असतानाच कुंदन यांनी आणखी एक घोळ घातला आहे. सोमवारी १८ डिसेंबरला साकीनाका येथील भानु फरसाणला लागलेल्या आगीत १२ जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. याबाबत बुधवारी (२० डिसेंबर) स्थायी समितीच्या बैठकीत कुंदन यांनी निवेदन सादर केले. हे निवेदन सादर करताना कुंदन यांनी या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला होता. नंतर आणखी एकाचा मृत्यू झाला असून एकूण १३ जण मृत्यू झाल्याचे आपल्या निवेदनात सांगितले. यानंतर निवेदनावर बोलताना सर्वच नगरसेकानीही १३ जण मृत्यू झाल्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला. हे सर्व स्थायी समितीच्या मिनिटमध्येही नोंद झाले. यानंतर मात्र पालिकेला आपन केलेली चूक निदर्शनास आली आहे. याबाबत सारवासारव करताना अतिरिक्त आयुक्त बाई तो १३ वा व्यक्ती घरी निघून गेला असे बोलल्या असतील, १२ मृत्यू झाले हेच खरे आहे असे पत्रकारांना पटवून देण्याचा प्रयत्न करून अतिरिक्त आयुक्तांकडून निवेदन करताना झालेल्या चुकीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान हा प्रकार स्थायी समिती सदस्यांना समजल्यावर त्यांनीही कपाळावर हात मारून घेतला.
यासंदर्भातील मागील बातमी -
स्थायी समितीत गंभीर विषयावरील चर्चे दरम्यान प्रशासनाच्या डुलक्या
http://www.jpnnews.in/2017/12/Bmc-prashsanachya-dulkya.html