मुंबई । प्रतिनिधी - मला मिल येथील वन अबव्ह आणि मोजो पबला लागलेल्या आगीमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. १४ जणांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या दोन्ही पेबच्या मालकांवर गुन्हा नोदवण्यात आला आहे. दोन्ही पबच्या मालकांचा पोलीस तपास करत असून मालक भेटत नसल्याने वन अबव्हच्या मालकाला मदत केल्याप्रकरणी भायखळा पोलिसांनी शनिवारी रात्री महेंद्रकुमार, राकेश आणि आदीत्य संघवी यांना अटक केली. हे तिघेही जण संघवी बंधूचे चुलते आहेत. मात्र रविवारी दुपारी हाॅलिडे कोर्टाने या तिघांची जामीनावर मुक्तता केली.
कमला मिलच्या आगीला कारणीभूत असलेले आरोपी सापडत नसल्याने आता पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांविरोधात कारवाईस सुरुवात केली आहे. भायखळा पोलिसांनी 'वन अबव्ह' या पब मालकाच्या काकाविरोधात भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुतण्याला लपविल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. 'वन अबव्ह'च्या मालकाचे काका भायखळ्यात राहत असल्याने भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कमला मिलमध्ये आग लागल्यानंतर पोलिसांनी या पबच्या मालकाचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या घर, कार्यालय आणि नातेवाईकांच्या घरीही धाडी मारल्या. त्यांच्याविरोधात लुक आऊट नोटीसही जारी केली. पण तरीही हे आरोपी सापडत नाहीत. शिवाय त्यांचे नातेवाईक त्याची माहितीही देत नसल्याने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं. हे तिन्ही आरोपी पुण्याला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलिसांची ५ पथकं त्यांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली. सोबतच या प्रकरणाचा तपास करताना महेंद्रकुमार, राकेश आणि आदीत्य संघवी या तिघांनी आरोपी संघवी बंधूला पळून जाण्यास मदत केल्याचं पुढे आलं. त्यानुसार भायखळा पोलिसांनी तिघांवर २१६ अंतर्गत गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली. या तिघांना किल्ला कोर्टातील हाॅलिडे कोर्टात हजर केलं असता. कोर्टाने त्यांची जामीनावर मुक्तता केली.