Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

महापौरांनी प्रोटोकॉल तोडल्याने संतापाची लाट


मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत बेकायदेशीर सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर बंदी आणावी म्हणून मुंबईच्या महापौरांनी मुंबई पोलीस आयुक्तांची घेतलेली भेट वादग्रस्त ठरली आहे. पोलीस आयुक्तांची भेट घेण्यास महापौर गेल्याने महापौरांनी प्रोटोकॉल तोडला असून त्यांनी मुंबईच्या प्रथम नागरिक म्हणून असलेली महापौरपदाची शान घालवली असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. महापौरांची भेट शिवसेनेतील नेत्यांना आणि शिवसैनिकांनाही आवडलेली नाही. महापौरांच्या विरोधात सोशल मिडीयावरही उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

मुंबईत मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरु असून या हुक्का पार्लरमध्ये तरुण पिढी मादक पदार्थांचे सेवन करीत आहे. या हुक्का पार्लरमध्ये गुन्हेगारी क्षेत्रातील समाजकंटकांच्या सर्रास वावर असतो. दुर्दैवाने आजची तरुण पिढी याकडे आकर्षित होत असल्याने समाज स्वास्थाच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. सामाजिक सुरक्षिततेसाठी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस यंत्रणांनी एकत्र येऊन हुक्का पार्लरवर प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याने मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची पोलीस मुख्यालयात भेट घेतली.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पोलीस आयुक्तांची भेट त्यांच्या कार्यालयात जाऊन घेतल्याने पालिकेतील नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापौर हे मुंबईचे प्रथम नागरिक आहेत. त्यांनी प्रोटोकॉल पाळायला हवा होता. महापौरांनी मुंबई पोलीस आयुक्तांना आपल्या भेटीला बोलवायला हवे होते. महापौरांना आयुक्तांसोबत बैठकही लावता आली असती किंवा एखादे पत्रही देता आले असते. मात्र असे न करता महापौरांनी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतल्याने मुंबईच्या प्रथम नागरिकाची असलेली प्रतिमा तोडून टाकली आहे. महापौरांनी फक्त आपल्या पदाचा अवमान केला नसून सव्वा कोटी नागरिकांचा अपमान केल्याचा आरोप महापौरांवर केला जात आहे.

शिवसेना प्रशासनाला शरण गेली - 
मुंबई महानगरपालिकेतील सर्व निर्णय प्रशासन घेत आहे. पालिकेचे निर्णय महापौरांच्या माध्यमातून नागरिकांना कळायला हवेत. मात्र असे न होता थेट मुख्यमंत्र्याना सादरीकरण केले जाते, मुख्यमंत्र्यांची मंजुरी घेतली जाते. याला सत्ताधारी शिवसेनेने विरोध केला मात्र शिवसेनेच्या बाविरोधाला न जुमानता प्रशासन आपले काम करत आहे. यामुळे आता सात्ताधारी शिवसेनेने प्रशासनापुढे शरण जाण्याची मानसिकता तयारी केली आहे. शिवसेना प्रशासनाला शरण गेल्याने महापौरांकडून असा प्रकार झाला असावा. 
- राखी जाधव, गटनेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस

महापौरांना खुर्चीची किंम्मत नाही - 
महापौर मुंबईचे प्रथम नागरिक आहेत. महापौरांना आपल्या खुर्चीची किंम्मत माहीत नाही. महापौरांनी पोलीस आयुक्तांना आपल्या दालनात बोलवून घ्यायला हवे होते. महापौरांनी प्रथम नागरिकाची प्रतिमा तोडून टाकली आहे. हा सव्वा कोटी मुंबईकरांचा अपमान आहे. 
- कप्तान मलिक, नगरसेवक

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom