मुंबई । प्रतिनिधी - केंद्र सरकारच्या "स्वच्छ भारत अभियान" स्पर्धेत मुंबईचा क्रमांक उंचविण्यासाठी मुंबईतील २४ प्रभागात, "स्वच्छ मुंबई अभियान" राबविण्यात यावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली होती. याला अनुसरून महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी महापालिकेद्वारे याच महिन्यात पालिकेच्या २४ प्रभागात, "स्वच्छ मुंबई अभियान "स्पर्धा घेण्याचे जाहीर केले आहे.
केंद्र सरकारने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जन्म शताब्दीनिमित्त "स्वच्छ भारत अभियानाची " मोहीम सुरु केली. नागरिकांच्या सहभागामुळे या अभियानाचे रूपांतर राष्ट्रीय चळवळीत झाले आहे. देशपातळीवर स्वच्छ शहराची स्पर्धा घेऊन नामांकन केली जात असल्याने व महापालिकांचा गौरव केला जात असल्याने अनेक महापालिका स्वच्छतेबाबत जागृत झाल्या आहेत. या स्पर्धेमध्ये जागतिक दर्जाचे शहर म्हणवणारे मुंबई मात्र पिछाडीवरच राहिले आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील ४४ शहरांनी सहभाग घेतला. त्यामध्ये नवी मुंबईचा ८ वा तर मुंबईचा २९ वा क्रमांक आला. स्वच्छ भारत अभियानात मुंबईचा क्रमांक उंचविण्यासाठी मुंबईतील २४ प्रभागात, "स्वच्छ मुंबई अभियान " राबविण्यात यावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली होती. त्याला असनुसरून पालिका आयुक्तांनी मुंबईचे नाव या स्पर्धेमध्ये पुढे राहावे म्हणून "स्वच्छ मुंबई अभियान" स्पर्धा घेण्यास मंजुरी दिली आहे. "स्वच्छ मुंबई अभियान" स्पर्धेचे मूल्यांकन प्रभागातील रुग्णालये, मार्केटस, शाळा, हॉटेल्स, गृहनिर्माण संस्था, मोहल्ले आणि व्यापारी संघटना यांच्या स्वच्छतेबाबतच्या मुद्द्यावर आधारित असणार आहे. मानक कार्यप्रणालीनुसार प्रश्नावली तयार करणे, स्पर्धेसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी तयार करणे, स्पर्धेचे आयोजन, मूल्यांकन व निकाल सादर करणे आदी बाबीसाठी एका खाजगी संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे आयोजन याच महिन्यात करून निकाल ३१ डिसेंबर २०१७ पूर्वी जाहीर करण्यात येणार आहे.