मुंबई । प्रतिनिधी -
नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी व ख्रिसमस निमित्त गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या प्रवाशांच्या सोयी साठी कोंकण रेल्वेने २१ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत विशेष गाड्या सोडण्याचे ठरविले आहे. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते करमाळी या स्थानकांदरम्यान धावणार आहेत. या गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या स्थानकांवर थांबणार आहेत. सर्व गाड्या १४ डब्यांच्या असून त्यांना एसी टू टायरचा एक कोच, एसी थ्री टायरचे ५ कोच, सेकण्ड स्लीपर क्लासचे ६ कोच, जनरलचे २ कोच आहेत.
सीएसएमटी ते करमाळी (०२०२५) ही गाडी २१ आणि २८ डिसेंबर रोजी सकाळी पाच वाजता सुटणार असून ती दुपारी १ वाजून २० मिनिटांनी करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी करमाळी ते सीएसएमटी २१ आणि २८ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून रात्री ११ वाजता सीएसएमटीला येईल. सीएसएमटी ते करमाळी (०२०२७) ही गाडी २३, २४, ३० आणि ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी सुटणार असून त्याच दिवशी सकाळी ११ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी २३,२४, ३० आणि ३१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता सुटणार असून त्याच दिवशी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सीएसएमटी येथे पोहचतील. सीएसएमटी ते करमाळी (०२०२९) खास गाडी २५ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी सुटणार असून त्याच दिवशी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी करमाळी ते सीएसएमटी २५ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता सुटून रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सीएसएमटीला येईल.