म्युनिसिपल मजदूर संघाची मागणी -
मुंबई । प्रतिनिधी - साकीनाका येथील खैराणी रोडवरील भानु फरसाण कारखान्याला लागलेल्या आगीत १२ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर गाळा मालक व कारखान्याच्या चालकावर कारवाई करण्यात आली. मात्र ज्या पालिका अधिकाऱ्यांमुळे असे अनधिकृत धंदे सुरु आहेत अश्या पालिका अधिकाऱ्यांवर मात्र कोणतीच कारवाई होत नाही. यामुळे दुर्घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी म्युनिसिपल मजदूर संघाचे सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी केली आहे.
भानू फरसान दुकानाला सोमवारी (१८ डिसेंबर) पहाटे भीषण आग लागली. सदर फरसाणाचा कारखाना अनधिकृतपणे सुरु होता. या कारखान्यात परवानगी नसताना कामगारांना राहायाला दिले होते. पहाटे आग लागली तेव्हा सर्व कामगार झोपेमध्ये होते. आग लागली तेव्हा काही जण बाहेर पळाले असले तरी या दुर्घटनेत १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर आयुक्तांनी चौकशी समिती नेमली. दुर्घटनेला सात दिवस उलटून गेले तरी, अद्याप जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. आतापर्यंत कारखाना मालकावर कारवाई झाली आहे. त्यामुळे केवळ मालकांवर कारवाई न करता प्रशासनातील सर्वच विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रकाश जाधव यांनी केली आहे.