निविदा अंतिम टप्प्यात -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबईतील बच्चे कंपनीसाठी आवडते स्थान म्हणजे भायखळा येथील राणी बाग. या राणीबागेचे नूतनीकरण सुरु आहे. दुरुस्तीकरणाचा एक भाग म्हणून राणी बागेमधील जुने झालेले प्राण्यांचे पिंजरे काढून त्या ठिकाणी नवीन 17 पिंजरे उभारले जाणार आहेत. या पिंज-यांसाठी पालिका 120 कोटी रुपयाचा खर्च करणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे.
राणी बागेत येणा-या पर्यटकांना पाहण्यासाठी येथे विविध प्रकारचे प्राणी ठेवण्यात आले आहेत. या प्राण्यांसाठी असलेले 17 पिंजरे जुने झाले आहेत. राणी बागेचा विकास करण्याची योजना पालिकेने आखली आहे. त्यामुळे येथील जुने पिंजरे काढून तेथे शोभिवंत नवीन पिंजरे बसवण्याचा निर्णय़ पालिकेने घेतला आहे. वाघ, सिंह, तरस, हत्ती , गवा, अस्वल, हायना, पाणघोडा, लांडगा, उंट, कोल्हा आदी इंडियन प्राण्यांसाठी हे नवीन पिंजरे बसवले जाणार आहेत. यासाठी 120 कोटी रुपयाचा खर्च येणार असून त्याच्या निविदा प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे. पिंजरे बनवण्याचा कालावधी दीड वर्षाचा असणार आहे. सध्या जिजामाता उद्यानात हंबोल्ट पेंग्विन आल्यानंतर पर्यटकांच्या गर्दीत वाढ झाली आहे. राणीबागेत पेंग्विन दाखल झाल्यानंतर राणीबागेतील पर्यटकांची गर्दी वाढली आहे. मागील आठ महिन्यांत 12 लाख 39 हजार 231 लोकांनी पेंग्विन दर्शन घेतले. त्याच्या शुल्कापोटी पालिकेच्या तिजोरीत 2 कोटी 33 लाख रुपये इतका महसूल जमा झाला आहे. यामुळे राणीबागेत आणखी नवे प्राणी आणून पर्यटकांची संख्या आणखी वाढवण्याचा प्रयत्न पालिकेकडून केला जात आहे.