मुंबई । प्रतिनिधी - आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाने आर्थिक काटकसर करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रस्त्यावर धावणाऱ्या तब्बल १६० बसगाड्या उपक्रमाच्या ताफ्यातून काढून भंगारात काढल्या जाणार आहेत. यामुळे आधीच बसची वाट बघत ताटकळत उभ्या राहणाऱ्या प्रवाशांना आता आणखी वाट बघावी लागणार आहे.
बेस्ट उपक्रम सध्या अर्थी घाट्यात आहे. बेस्टला पालिकेने आर्थिक मदत करावी म्हणून प्रयत्न सुरु आहेत. मात्र आर्थिक मदतीसाठी बेस्टच्या कामात सुधारणा करण्याची सूचना पालिका आयुगी अजोय मेहता यांनी केली आहे. त्यानुसार बेस्ट उपक्रमाने काटकसरीचा प्रस्ताव तयार केला. यात बेस्ट बसगाड्यांवरील खर्च कमी करण्याच्या उद्देशाने बेस्ट बस गाड्यांचा ताफा कमी करण्याचे सुचवण्यात आले आहे. बेस्टकडे तीन वर्षांपूर्वी ४ हजार ८०० बसगाड्या होत्या. आज बेस्टच्या ताफ्यात ३ हजर ४८० बसगाड्या आहेत. काटकसरीच्या उपाय योजनेनुसार बेस्टला आपल्या बसगाड्यांचा ताफा ३ हजर ३३७ पर्यंत स्थिर ठेवायचा आहे. त्यानुसार १५९ बस गाड्या अतिरिक्त ठरत असल्याने प्रशासनाने बेस्ट समितीसमोर चांगल्या स्थितीतील व १५ वर्षे आयुर्मान पूर्ण न केलेल्या १५९ बस भंगारात काढण्याचा प्रस्ताव सादर केला होता. बेस्ट समितीने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. या बस गाड्यांमध्ये ६३ मिनी व इतर मोठ्या सी. एन. जी. वर चालणाऱ्या बसगाड्या आहेत.
बेस्टकडे पैसे नसल्याने सध्या नव्या बस खरेदी करू शकत नाही. बेस्ट समितीत सध्या नवीन खाजगी तत्वावर घेण्यात येणाऱ्या २०० बसच्या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. एम. एम. आर. डी. ए. ने बेस्टला दिलेल्या बस सुरू करण्यास अजून मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे सध्या बस गाड्यांच्या कमतरतेमुळे बेस्ट बस प्रवर्तन करण्यास अनेक अडचणी येत आहेत. आजच्या घडीला बस प्रवाशांना बससाठी अर्धा एका तास ताटकळत बसावे लागते. अशा परिस्तिथीत कोणताही पर्याय न ठेवता बेस्ट बसगाड्या कमी केल्याने बेस्टच्या प्रवाशांची संख्या कमी होणार असून बेस्टच्या महसुलावरही त्याचा परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.