मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांच्या सहित अन्य 6 बड्या लोकांनी केलेले अनधिकृत बांधकाम महापालिकेने नियमित केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना पालिकेच्या पी दक्षिण वॉर्ड कार्यालयाचे पद निर्देशित अधिकारी आणि सहायक अभियंता यांनी दिली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना महापालिकेच्या पी दक्षिण वॉर्ड कार्यालयाचे पद निर्देशित अधिकारी आणि सहाय्यक अभियंता यांनी माहिती अधिकारात माहिती उपलब्ध करून दिली आहे. यानुसार गोरेगांव पूर्व येथील अमिताभ बच्चन, राजकुमार हिराणी, ओबेरॉय रियालिटी, पंकज बलानी, हरेश खंडेलवाल, संजय व्यास, हरेश जगतानी अश्या 7 लोकांना मंजूर आराखडयानुसार आढळून आलेल्या अनियमितता पूर्ववत करण्यासाठी एमआरटीपीची नोटीस 7 डिसेंबर 2016 बजावली होती. एमआरटीपीच्या नोटीसनंतर वास्तुविशारद शशांक कोकीळ यांनी 5 जानेवारी 2017 रोजी सादर केलेला प्रस्ताव 17 मार्च 2017 रोजी इमारत व प्रस्ताव खात्याने नामंजुर केला. याबाबत इमारत व प्रस्ताव खात्याने 11 एप्रिल 2017 रोजी पी दक्षिण कार्यालयास रीतसर माहिती देताच 6 मे 2017 रोजी पी दक्षिण कार्यालयाने अंतिम आदेश देत अनधिकृत बांधकाम स्वतःहुन काढण्याची तंबी दिली होती. यानंतर वास्तुविशारद शशांक कोकीळ यांनी दुसऱ्यादा प्रस्ताव सादर केला होता. अँड असोसिएट्स यांनी दिनांक 5 जानेवारी 2017 रोजी मंजूर आराखड्यात नसलेल्या बाबी मंजूर करण्यासाठी सुधारित आराखडे मंजुरीकरिता कार्यकारी अभियंता, इमारत प्रस्ताव ( पश्चिम उपनगरे), पी विभाग यांच्याकडे सादर केले होते त्यानंतर कार्यकारी अभियंता, इमारत प्रस्ताव ( पश्चिम उपनगरे), पी विभाग यांच्याकडून अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात आलेले आहे.
दरम्यान अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र पाठवून ताबडतोब एमआरटीपी कायदा अंतर्गत कार्यवाही करण्याची मागणी करत अनधिकृत बांधकामे तोडण्याची मागणी केली होती परंतू या अनधिकृत बांधकामास नियमित करण्यासाठी वेळखाऊ धोरण पालिकेने अवलंब करण्याचा आरोप अनिल गलगली यांनी केला आहे. इमारत प्रस्ताव खात्यातील काही अधिका-यांस अनधिकृत बांधकाम नियमित करण्याच्या प्रयत्नाला यश आले असल्याची टीका अनिल गलगली यांनी केली आहे. गरिबांच्या झोपडीवर बुलडोझर चालविणारी मुंबई महानगरपालिका बड्या लोकांच्या अनधिकृत बांधकामास नियमित करण्यात धन्यता मानते, अशी खंत अनिल गलगली यांनी व्यक्त केली आहे.