मुंबई - बीडीडी चाळीत ३० वर्षांपासून राहणाऱ्या पोलिसांना घरे तयार झाल्यावर हस्तांतरित करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाला दिले. आज मंत्रालयात आयोजित बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाबाबत बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बीडीडी चाळीत गेल्या 30 वर्षांपासून जवळपास 2950 पोलीस कुटुंबीय राहतात. म्हाडाची घरे तयार झाल्यावर त्यापैकी 2950 घरे गृह विभागाला हस्तांतरित करावीत. घरे देताना त्याचे निकष काय असावेत, याचा निर्णय गृह विभागाने घ्यावा. 1996 नंतर बीडीडी चाळीत अनधिकृतपणे राहणाऱ्या कुटुंबांना काही दंड आकारुन त्यांनाही नियमित करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली तसेच म्हाडाच्या घरांची कामे तातडीने सुरु करावीत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या बैठकीला मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी,गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी सुभाष लाखे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.