मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेत दोन वर्षांपूर्वी रस्ते घोटाळा गाजला होता. या घोटाळ्यातील २३४ पैकी ३४ रस्त्याच्या घोटाळ्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. यात १०० अभियंत्यांपैकी ९६ अभियंत्यांना दोषी ठरवण्यात आले. तर चौघांना बडतर्फ करण्यात आले. उर्वरित २०० रस्त्यांचा चौकशी अहवाल येत्या आठवडाभरात सादर केला जाणार आहे. यात अनेक अभियंते आणि कंत्राटदार अडकणार असल्याची शक्यता आहे.
मुंबईतील रस्ते कामात अनियमितता झाल्याप्रकरणी तत्कालिन महापौर स्नेहल आंबेकर यांनी पालिका आयुक्तांकडे तक्रार करुन चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. दोन वर्षापूर्वी मुंबईतील तब्बल २३४ रस्त्यांच्या कामांतील ३५२ कोटींचा घोटाळा उघड झाला. याप्रकरणी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. पहिल्या टप्प्यातील अहवालात काही कंत्राटदार आणि दोन पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. त्यानंतर ३४ रस्त्यांचा अहवालनुकताच आयुक्तांना सादर झाला. यात पालिकेतील १०० अभियंत्याची चौकशी केली. दरम्यान, तब्बल ९६ अभियंत्याना दोषी ठरविण्यात आले. ४ अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. उर्वरित २०० रस्त्यांचा चौकशी अहवाल प्रलंबित आहे. या अहवालाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून येत्या आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे सुतोवाच पालिकेने दिले आहे. लवकरच हा अहवाल सादर होणार असून यात मोठे मासे अडकण्याची शक्यता आहे. तसेच कंत्राटदारांसह अभियंतेही अडकणार आहेत. ३४ रस्ते कामांत ९६ अभियंत्यांवर कारवाई झाल्यानंतर २०० रस्त्यांच्या कामांतील आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.