मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना 27 शालेय वस्तू वेळेत वाटप केल्या जात नसल्याने मनसेने विद्यार्थ्यांना त्याबदल्यात पैसे देण्याची मागणी केली होती. याबाबत पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत एकमत न झाल्याने या प्रस्तावावर कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे हा प्रस्ताव मंजुरीविना परत पाठवण्यात आला. येत्या बैठकीत हा विषय मंजुरीसाठी आणला जाणार आहे.
मुंबई महापालिकेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी 27 शालेय वस्तूंचे वाटप केले जाते. याबाबतच्या निविदा प्रक्रिया वेळेत होत नाहीत, शिवाय देण्यात येणा-य़ा वस्तू निकृष्ट दर्जाच्या असल्याचे यापूर्वी अनेकवेळा समोर आले आहे. या वस्तूही विद्यार्थ्या्ंना वेळेत मिळत नसल्याने सभागृहात वाद रंगले आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या गटनेत्या बैठकीत 27 शालेय वस्तू देण्याबाबतचा प्रस्ताव बैठकीत चर्चेला आला. मात्र यावेळी 27 वस्तू देण्याऎवजी या वस्तूंचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावेत, अशी भाजपने भूमिका मांडली. मात्र याला विरोध करीत सत्ताधारी शिवसेनेने पैसे नको, वस्तूच द्यायला हवे अशी भूमिका मांडली. पैसे दिल्यास पालकांकडून खर्च होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, त्यामुळे वस्तू दिल्यास मुले त्याचा वापर करू शकतील असे शिवसेनेचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रस्तावावर शिवसेना - भाजपचे एकमत नसल्याने हा प्रस्ताव मंजूरीविना परत पाठवण्यात आला आहे. येत्या बैठकीत यावर चर्चा करून मंजूरीबाबतचा निर्णय़ घेतला जाणार आहे. दरम्यान, 27 वस्तूंबाबत दरवर्षी वाद होतात. कधी प्रशासनाचा प्रस्तावावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जाते, तर कधी निकृष्ट दर्जाच्या वस्तू देण्यात येत असल्याने तीव्र विरोध केला जातो. प्रशासनाकडूनही या वस्तू देण्याबाबत हलगर्जीपणा केला जातो. त्यामुळे अनेकवेळा मुलांना या शालेय वस्तू वर्षाच्या अखेरीला मिळतात. या वस्तूही निकृष्ट दर्जाच्या मिळत असल्याने पुन्हा सत्ताधारी, प्रशासन व विरोधकांमध्ये ख़डाजंही होते. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षासाठी मिळणा-या शालेय वस्तू तरी वेळेत व दर्जेदार मिळतील का? असा प्रश्न पालकांकडून विचारला जातो आहे.