मुंबई । प्रतिनिधी - काँग्रेसचे माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत गेले कित्तेक वर्षे राजकीय क्षेत्रापेक्षा सामाजिक क्षेत्रात जास्त कार्यरत होते. नुकताच त्यांनी आम आदमी पसाखात प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष (आप) यापुढे राज्यातील विधानसभा, लोकसभेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा सावंत यांनी केली आहे. दादर येथील शिवाजी मंदिर येथे गुरुवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत हाेते.
सावंत म्हणाले, आप राज्यात पक्ष बांधणी करत आहे. २३० विधानसभा मतदारसंघात निरीक्षक नेमले आहेत. आजमितीस राज्यात आपचे दहा हजार सक्रीय कार्यकर्ते आहेत. जुन्या नेत्यांबाबत पक्ष निर्णय घेईल; मात्र राज्यात नवे कार्यकर्ते पक्षाशी जोडण्याचे काम चालु आहे. शिवराज्य पक्षातील हजारो कार्यकर्ते आपमध्ये सहभागी होत आहेत. राज्याचे प्रभारी पंकज गुप्ता लवकरच राज्य टीम घोषीत करणार अाहेत. त्यानंतर पक्ष बांधणीला आणखी गती मिळेल. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. या आत्महत्या कमी करण्यासाठी काय उपाय करता येतील, याकडे पक्ष लक्ष देणार आहे. विधानसभेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न लढवल्यामुळे आपचे कार्यकर्ते नाउमेद झाले होते. यापुढे पक्षाने राज्यातील आगामी सर्व निवडणुका लढवायच्या असा निर्णय घेतला असल्याचे ब्रिगेडीअर सावंत यांनी स्पष्ट केले.
ब्रिगेडिअर सावंत मूळचे कोकणातील. एकेकाळी राजीव गांधी यांचे ते जवळचे होते. राजापूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी मधू दंडवते यांचा परभव केला. त्यानंतर ते बसप मध्ये गेले. तेथून त्यांची हकालपट्टी झाली. त्यानंतर त्यांनी स्वत:चा शिवराज्य पक्ष काढला. तो पक्ष उभारी घेऊ शकला नाही. मागच्या विधानसभा निवडणुकात त्यांनी १२ छोट्या पक्षांची तिसरी आघाडी स्थापन केली होती. त्यात यश आले नाही. १२ जानेवारी रोजी सिंदखेड राजा येथे जिजाऊ यांच्या जयंतीदिनाच्या कार्यक्रमात आपचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आज पहिल्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील सर्व निवडणुका लढण्याची त्यांनी घोषणा केली.