मुंबई | प्रतिनिधी - मुंबईतील फेरीवाल्यांना आपला धंदा करता यावा म्हणून महापालिकेने 85 हजार 891 जागा निश्चित केल्या आहेत. त्यासाठी हरकती, सूचना मागवण्यात आल्या असतानाच येत्या आठवडा भरात फेरीवाल्यांची पात्र- अपात्रता ठरवण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. त्यामुळे गेले अनेक वर्ष रेंगाळलेला फेरीवाल्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.
मुंबईतील फेरीवाल्यांना बसण्यासाठी पालिकेने 85 हजार 891 जागा निश्चित केल्या आहेत. या जागा अंतीम करण्यासाठी पालिकेने नागरिकांकडून हरकती -सूचना मागवल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जागांबाबतचा निर्णय अंतिम होणार आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या फेरीवाल्यांचे कागदपत्रे तपासली जाणार असून त्यांची पात्रता निश्चित करण्यात येणार आहे. निश्चित करण्यात आलेल्या जागांबाबत हरकती, सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्याची मुदत 31 जानेवारीपर्यंत आहे. हे काम सुरु असतानाच आता फेरीवाल्यांची पात्र- अपात्रता निश्चित केली जाईल. फेरीवाल्यांची पात्र- अपात्रता निश्चित झाल्यावर त्यांच्यातून 8 सदस्य नियुक्त केले जाणार आहे. रेल्वे स्थानक व मंड्यांपासून दिडशे मीटर व रुग्णालये, शाळा, मंदिरांपासून 100 मीटर अंतर परिसरात फेरीवाल्यांनी बसू नये असा नियम आहे. मात्र या नियमांची अंमलबजावणी केली जात नाही. एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मुंबईतील फेरीवाल्यांचा प्रश्न ऎरणीवर आला. मनसेने फेरीवाला हटाव मोहिम सुरु केली. याचवेळी पालिकेनेही फेरीवाल्यांवरील कारवाई तीव्र केली. मात्र मागील अनेक वर्षापासून फेरीवाला धोरण राबवले जात नसताना कारवाई करू नये. त्यासाठी टाऊन वेंडिंड कमिटीची स्थापना करून फेरीवाल्यांची पात्र - अपात्रता निश्चित करावी व हॉकर्स- नॉन हॉकर्स झोन तयार करावे ही मागणी जोर धरु लागली. त्यापूर्वी 20 जणांची टाऊन वेंडिंग कमिटी नियुक्त करण्यासाठी जाहिरात देऊन अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार अनेकांनी अर्ज केले. या अर्जांची पात्र -अपात्रता निश्चित करण्यात आली. यात पाच शासकीय अधिकारी व संस्था - मंडऴे यांचे सात सदस्य अशा 12 जणांची समिती नियुक्त करण्यात आली असून राज्य सरकारने याला मंजुरी दिली आहे. यांत फेरीवाल्यांमधून आठ जणांना नियुक्त करणे आवश्यक आहे. फेरीवाल्यांची पात्र -अपात्रता निश्चित झाल्यावर त्यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती एका अधिका-याने दिली.