निविदा अंतीम टप्प्यात -
मुंबई | प्रतिनिधी -
मुंबईतील उघड्या मॅनहोलमध्ये पडून डॉक्टर अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. यानंतर मॅनहोलबाबत मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून मुंबईतील सर्व मॅनहोलना जाळी लावण्याचे काम पालिका युध्दपातळीवर हाती घेणार आहे. पहिल्या टप्प्यात 15 मे पूर्वी पाणी साचणाऱ्या ठिकाणी असलेल्या 1,800 मॅनहोलना जाळी लावण्याचे काम पूर्ण केले जाणार असून लवकरच त्याची निविदा काढली जाणार आहे.
मुंबईतील सुमारे एक लाख मॅनहोल आहेत. मोठा पाऊस पडल्यावर पाणी साचते. या पाण्याचा निचरा करण्यासाठी अनेकवेळा मॅनहोल उघडे ठेवावे लागतात. 29 ऑगस्ट रोजी मोठा पाऊस पडल्याने पाणी साचले होते. वरळी भागातील काही मॅनहोल उघडण्यात आले. त्यात पडून डॉ. अमरापूरकर या पोटविकार तज्ञाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर पालिकेच्या निष्काळजीपणा समोर आला. सर्व क्षेत्रातून प्रशासनावर टीकेची झोड उठली. यानंतर अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी सर्व मॅनहोलना जाळी लावण्याचा निर्णय पालिकेने घेतला चायापुढे अशी दुर्देवी घटना घडू नये यासाठी पालिकेने मुंबईतील सर्व मॅनहोलना वेगळ्या आकाराची जाळी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मॅनहोलच्या झाकणाच्या 3.5 इंच खाली जाळी बसवली जाणार आहे. कितीही पाऊस झाला तरी अशी घटना घडणार नाही, अशा प्रकारची जाळी असेल. शहरात एक लाखाहून अधिक सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचे नाले आहेत. सद्या पूर परिस्थिती व पाण्याचा निचरा न होणा-या ठिकाणी या जाळ्या लावल्या जाणार आहेत. प्रथम दादर, हिंदमाता, परेल, मिलन सबवे, किंगसर्कल, चेंबूर आदी पाणी साचणाऱ्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात जाळ्या लावण्या जाणार आहेत. एका मॅनहोलच्या जाळीसाठी सात ते आठ हजार रुपये खर्च येणार आहे. अशी एक लाख मेनहोलचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामाच्यान निविदा प्रक्रिया अंतीम टप्प्य़ात असून पावसापूर्वी हे काम पूर्ण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.