मुंबई । प्रतिनिधी - मुंबईतील कोळीवाड्यांच्या गावठाणांमधील घरांना महापालिकेकडून इतर झोपडपट्टीप्रमाणे १४ फुटाचा नियम लावला जात होता. १४ फुटावरील गावठाणांमधील कोळी समुदायाच्या घरांवर पालिका तोडकी कारवाई करत होती, मात्र राज्य सरकारच्या जीआर प्रमाणे कोळीवाड्याना ३३ फुटाची परवानगी असल्याची बाब अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल आणि चिटणीस आनंद हुले यांनी मुंबईचे महापौर तसेच पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणली आहे. याची दखल घेत आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती तांडेल यांनी दिली.
मुंबईमध्ये कोळी समाजाचे ४५ कोळीवाडे व १०० गावठाणे आहेत. याठिकाणी केली समाजाच्या कित्तेक पिढ्या वास्तव्य करत आल्या आहेत. मात्र या ठिकाणी घरे उंच करताना आणि दुरुस्त करताना पालिकेकडून अनेक अडचणी येत होत्या. १४ फुटावरील घर आढळल्यास पालिकेकडून कारवाई केली जात होती. ‘कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाचे नियम मुंबई विकास नियंत्रण नियमावलीमध्ये अंतर्भूत नव्हते. यामुळे कोळी समाजाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. याबाबत अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल सातत्याने पाठपुरावा करत होते. राज्य शासनाच्या ८ मे २०१२ रोजीच्या अधिसूचनेमध्ये गावठाणाच्या पुनर्विकासाच्या तरतूदी कोळीवाड्यांसह ३३ फूट उंचीच्या घरांचे बांधकाम करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरण आणि वन विभागाच्या ६ जानेवारी २०११ रोजी अधिसूचनेत वेळोवेळी सुधारित केलेल्या तरतूदीच्या अधिन राहून विकास करता येईल आणि सीआरझेडच्या अधिसूचनेत कोळीवाड्यातील घरांची उंची ९ मीटरपर्यंत बांधकाम करण्यासाठी संमती दिली आहे. याबाबतची माहिती तांडेल यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिली. यावर राज्य शासन व केंद्र शासनाने कोळीवाड्यांची घरे बांधण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेचे पालन करण्यात येईल, असे आश्वासन महापौैर व आयुक्तांनी दिले असल्याची माहिती तांडेल यांनी दिली.