मुंबई । प्रतिनिधी -
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा नियमितपणे व योग्यप्रकारे होत रहावा, यासाठी महापालिकेच्या जल अभियंता खात्यातील कामगार – कर्मचारी - अधिकारी अविरतपणे कार्यरत असतात. गेल्या महिन्यात कुर्ला परिसरात एका ठिकाणी आणि पश्चिम उपनगरामध्ये तीन ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे पाणी गळती उद्भवली होती. ही पाणी गळती थांबविण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना युद्धपातळीवर करुन पाणी पुरवठा अल्पावधीत पुन्हा सुरु करण्यात मोलाची भूमिका बजावणारे दुय्यम अभियंता रमेश वसंत मोरे व सहाय्यक अभियंता काशिनाथ पांडूरंग काजवे यांचा महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते प्रमाणपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन 'जानेवारी २०१८' साठी 'ऑफीसर ऑफ द मंथ' 'Officer of the Month' या बहुमानाने सत्कार करण्यात आला. या निमित्ताने पहिल्यांदाच क्षेत्रिय स्तरावर (Field Level) काम करणा-या अधिका-यांना हा बहुमान प्राप्त झाला आहे. याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.
आपल्या कौशल्यपूर्ण व तत्पर कामांमुळे 'महिन्याचे मानकरी' ठरलेले दुय्यम अभियंता रमेश वसंत मोरे यांनी पश्चिम उपनगरांमध्ये तीन ठिकाणी जलवाहिनी दुरुस्तीचे काम अत्यंत कमी वेळात पूर्ण केले होते. पश्चिम उपनगरांमध्ये सुरु असलेल्या विविध विकास कामांच्या दरम्यान गेल्या महिन्याभरात ३ ठिकाणी जलवाहिन्यांना हानी पोहचली होती. ज्यामुळे ४ डिसेंबर रोजी गोरेगाव पश्चिम परिसरात; दि. ८ डिसेंबर रोजी कांदिवली पश्चिम परिसरात; तर १९ डिसेंबर रोजी बोरिवली पश्चिम परिसरातील पाणी पुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. या तिन्ही ठिकाणी जल वाहिनी दुरुस्ती करणे व पाणी पुरवठा पूर्ववत करणे हे अत्यंत जिकिरीचे काम होते. याठिकाणी दुय्यम अभियंता मोरे व त्यांच्या सहका-यांनी अत्यंत मेहनत घेऊन पाणी पुरवठा अक्षरशः काही तासांमध्ये सुरु केला. तर दुसरे 'ऑफीसर ऑफ द मंथ' काशिनाथ पांडुरंग काजवे यांनी कुर्ला पूर्व परिसरातील प्रिमीयर नाल्याजवळ ५ डिसेंबर २०१७ रोजी उद्भवलेल्या १२०० मिलीमीटर व्यासाच्या मोठ्या जलवाहिनीची गळती थांबवून अत्यंत कमी वेळात जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण केले होते. हे काम करण्यासाठी अनेक दिवस लागतील, असा अंदाज होता. मात्र, जल अभियंता खात्यातील संबंधित सहाय्यक अभियंता काजवे व त्यांच्या सहका-यांनी दिवस - रात्र एक करुन युद्ध पातळीवर काम करित केवळ २ दिवसांत सदर काम पूर्ण केले. ज्यामुळे तक्रार प्राप्त झाल्यानंतर केवळ २ दिवसांत पाणीपुरवठा पूर्ववत झाला.