मुंबई | प्रतिनिधी - भिमा- कोरेगाव येथे १ जानेवारीला भीम सैनिकांवर दगडफेक करून हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात ज्या हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग होता, त्याच संघटनांकडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिवास धोका आहे, असा खळबजनक गौप्यस्फोट भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. आंबेडकर यांनी केलेल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ या संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून समाज माध्यमांवर टाकण्यात आलेल्या पोस्टचा हवाला यावेळी दिला.
अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी येथील भारिप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत बोलताना, १ जानेवारी रोजी रावसाहेब पाटील या युवकाने फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये भीमा कोरेगाव हिंचारात लोक कमी पडत असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि सामाजिक कार्यकर्ते सुधींद्र कुलकर्णी यांना बिनधास्त कापा, ही माणसे म्हणजे देशाला लागलेली कीड आहे, असे म्हटले होते. अशी पोस्ट टाकणारा पाटील स्वत:ची ओळख शिवसैनिक म्हणून करुन देतो. मात्र तो शिवसैनिक नसून संभाजी भिडे यांचा कट्टर अनुयायी आहे. गुप्त कारवाया करणाऱ्या हिंदुत्वादी संघटनांचे कार्यकर्ते खरी ओळख लपवून अशा पोस्ट टाकतात. त्यातलाच पाटील याचा हा प्रकार असल्याचा दावाही आंबेडकर यांनी केला.
मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना कापण्याची भाषा होत असताना, त्याबाबत त्यांना अवगत करण्यात आले नाही. पाटील यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधिक्षक, शहरचे पोलीस आयुक्त आणि गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांनी राज्यभर कोबिंग आॅपरेश राबवले. त्यात तीन हजार आंबेडकरी कार्यकर्ते पडकले गेले. त्यातील १२५ कार्यकर्ते मुंबईतील अाहेत. त्यात १६ अल्पवयीन आहेत. कोबिंग आॅपरेशन लष्कर करते. नागरी भागात ते पोलिसांना करता येत नाही, असा दावा करत कोबिंगच्या कारवाईस आपण न्यायालयात आव्हान देणार आहोत, असेही आंबेडकर म्हणाले. वढु बुद्रुक जवळील पाच गावांना छावणीचे स्वरुप आले आहे. गावकऱ्यांना पोलीसांनी असे वेठीस धरणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले. तसेच भीमा- कोरेगाव येथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाड्यांच्या नुकसानीबाबत स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये नोंद कराव्यात, असे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले.