मुंबई । प्रतिनिधी - भायखळा येथील राणीबागेत (वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात) पेंग्विन आणल्यानंतर उद्यानाच्या उत्पन्नात मागील सहा महिन्यांत तब्बल 12 पटीने वाढ झाली आहे. सहा महिन्यांत सुमारे 12 लाख 39 हजार 231 पर्यटक आल्याची नोंद झाली असून पूर्वी दहा ते बारा हजारांवर मिळणारे उत्पन्न आता शुल्कवाढीमुळे थेट लाखांवर गेले आहे. राणीबागेत प्रवेशशुल्क वाढवल्याने पर्यटकांची गर्दी कमी झाली असली तरी उत्पन्नात मात्र वाढ झाल्याचे दिसत आहे.
राणीच्या बागेत येणार्या पर्यटकांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी अनेक सुधारणा करण्यात येत आहेत. यामुळे राणीबागेचा कायापालट होत आहे. राणी बाग प्रवेश शुल्कवाढ १ ऑगस्टपासून लागू झाली आहे. या शुल्कवाढीनंतर रोज दहा ते बारा हजारांवर मिळणारे उत्पन्न आता तब्बल लाखांवर गेले आहे. विशेष म्हणजे कोरियासारख्या सातासमुद्रापार देशातच पहायला मिळणारे हंबोल्ट पेंग्विन जीजामाता उद्यानात २६ जुलै २०१६ रोजी दाखल झाले. त्यानंतर पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे राणी बागेतील पेंग्विनचा प्रवेश फलदायी ठरत आहे. राणीच्या बागेचे शुल्क याआधी २ ते ५ रुपयांपर्यंत होते. मात्र १ ऑगस्टपासून चार व्यक्तींच्या कुटुंबाला १०० रुपये, तर एका व्यक्तीला ५० रुपये आकारले जात आहेत. परदेशी पर्यटकांना (१२ वर्षांवरील) ४०० रुपये, १२ वर्षांपर्यंत (२०० रुपये), पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना नि:शुल्क, मासिक पास - १५० रुपये, ज्येष्ठ नागरिकांना नि:शुल्क असे शुल्क आकारण्यात येत आहे. शुल्कवाढीनंतर राणी बागेच्या उत्पन्नात 12 पटींनी वाढ झाली आहे. वाढलेल्या उत्पन्नामुळे राणीच्या बागेत आणखी सुधारणा करण्यात येतील. पर्यटकांना चांगल्या सुविधा देता येतील असे उद्यानसंचालक डॉ. संजय त्रिपाठी
यांनी सांगितले आहे.