मुंबई | प्रतिनिधी - कमला मिल आग दुर्घटनेनंतर आगीची चौकशी सुरु झाली आहे. या आगीत खुद्द महापालिका आयुक्तच दोषी आहेत. त्यामुळे यादुर्घटनेची आयुक्तांमार्फत चौकशी न करता सीबीआय किंवा न्यायालयीन चौकशी करावी. तसेच जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत आयुक्तांचे निलंबन करावे, अशी मागणी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. यावेळी दबाव टाकण्याऱ्या नेत्याचे नाव आयुक्तांनी उघड करावे, असे आवाहन निरुपम यांनी केले.
मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आपल्या कार्यालयात एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पत्रकार परिषदेला पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवि राजा, सरचिटणीस संदेश कोंडविलकर, भूषण पाटील, सुशीबेन शाह व प्रणील नायर उपस्थित होते. यावेळी बोलताना कमला मिलमधील दुर्घटनेत १४ जण मृत झाले. दुर्घटनेचे पडसाद देशात उमटले. यानंतर राज्य सरकारने महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. आयुक्तांमार्फत चौकशी करण्याएेवजी सीबीआय किंवा न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली. मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष केले. अनधिकृत बांधकामांवर कारवाईला सुरुवात झाली. कारवाईनंतर अवघ्या काहीच दिवसांत येथील स्मॅश गेमिंग सेंटर पुन्हा सुरु झाले आहे. या सेंटरला अजोय मेहता यांनी फक्त ५ दिवसात परवानगी दिली. यावेळी लिफ्ट बांधण्याची परवानगी नसतानाही ती बांधण्यात आली होती. मात्र तरीही खुद्द आयुक्तांनीच परवानगी दिली आहे, असा खळबळजनक आरोप संजय निरुपम यांनी परिषदेत केला.
आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा, त्यांनी केला. यावेळी रेसिंग ट्रेकळा परवानगी नसताना टे बांधण्यात आले. आणि हे नियमित करण्याचे काम आयुक्तांनी केल्याचा आरोप निरुपम यांनी केला. या दुर्घटनेत आयुक्तांसह मोठ्या पदावरील अभियंते व छोट्या अधिकारी सामील आहेत. मुंबई महापालिका भ्रष्टाचारात बरबटली आहे. आयुक्तांच्या कार्यालयापासून याची सुरुवात झाली असून याप्रकरणांची चौकशी करावी अशी मागणी करत मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरून पालिका आयुक्त अजोय मेहता हे संपूर्ण प्रकरण दडपण्याचे षड्यंत्र रचत असल्याचा आरोप निरुपम यांनी केला. रुफटॉप पॉलिसीला आपला विरोध नाही मात्र ज्या गोष्टी नियमांत बसत नाहीत जिथे सुरक्षा नाही, त्याची तजवीज नाही तेथे अशा पॉलिसी राबविण्यासाठी पालिका का धडपड करत आहे असा सवाल संजय निरुपम यांनी केला. कोणाच्या सांगण्यावरून हुक्का बारसाठी आणि रुफटॉप पॉलिसीसाठी पालिका अधिकाऱ्यांची धावपळ सुरु आहे ते स्पष्ट करावे अशी मागणी त्यांनी केली.
मोजोसवर कारवाई कधी ? -
मोजोज पबला पहिली आग लागली आणि मग ती बाजूच्या पबमध्ये गेली. आणि यात १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोजोजचे मालक ६ पैकी ५ जण नागपूरचे आहेत, हे नागपूर आणि भाजपा कनेक्शन आहे. त्यामुळेच त्यांना पकडण्यासाठी टाळाटाळ होत आहे. फक्त युग पाठक या एकालाच पकडले आहे. त्याला पकडण्यासाठी सुद्धा ९ दिवस लावले. मोजोजच्या एका मालकाचे वडील हे हवालाचे मोठे दलाल आहेत. त्यांचे दिल्लीत भाजपा नेत्यांशी घनिष्ट संबंध आहेत म्हणून हा तपास लांबवला जात आहे, असा आरोप निरुपम यांनी केला. मुख्यमंत्री आयुक्तान्मार्फातच चौकशी करून लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करत आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने नागपूरचे लोक मुंबईत येत असून येथील जीवनशैलीला गालबोट लावत असल्याचा आरोप त्यांनी केला.