मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत झोपडपट्टी पुर्नविकास योजना (एसआरए) मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत इमारती उभ्या राहिल्या तरी सुविधांची मात्र वानवा असते. यामुळे झोपडपट्टी पुर्नविकास योजनेतून बांधलेल्या १० वर्ष जुन्या इमारतीमधील पर्जन्य जलवाहिनी, गटार, मलनिःसारण वाहिनी व इतर मूलभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी नगरसेवक निधी वापरता यावा म्हणून निधी वापरण्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यात यावी. अशी मागणी भाजपच्या नगरसेविका संगीता शर्मा यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.
मुंबईत राहणाऱ्या झोपडपट्टी वसाहतीमधील रहिवाशांना झोपडपट्टी पुर्नविकास योजनेअंतर्गत मोफत घरे देण्यात येतात. या योजनेअतर्गत बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये प्रामुख्याने गरीब व मध्यमवर्गीय लोक राहतात. या इमारतींची दुरुस्ती करणे, परिरक्षण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे सदर इमारतींच्या आवारातील गटारे, मलनिःसारण आणि पर्जन्यजलवाहिन्या देखभाली अभावी नादुरुस्त झाल्या तर अनारोग्यकारक परिस्थिती निर्माण होऊन रहिवाशांना आजारांच्या परिणामाला समोरे जावे लागते. त्यामुळे पुर्नविकास योजनेतून बांधलेल्या १० वर्ष पूर्ण झालीत अशा इमारतीच्या पर्जन्य जलवाहिनी, गटार वाहिनी, मलनिःसारण वाहिनी व इतर मूलभूत सुविधांच्या दुरुसतीसाठी नगरसेवक निधी वापरता यावा म्हणून निधी वापरण्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यात यावी. असे त्यांनी आपल्या सूचनेमध्ये म्हटले आहे.