मुंबई । प्रतिनिधी -
कमला मिल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांना आपत्तीव्यवस्थापनाचे धडे दिले जाणार आहेत. तसेच पालिका शाळांचे फायर ऑडिट १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण केले जाणार आहेत. अशी माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे शिक्षण समितीत देण्यात आली.
‘कमला मिल’ दुर्घटनेनंतर पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या असा प्रश्न शिक्षण समितीत सदस्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांचे केवळ फायर ऑडिट नाही तर संपूर्ण सुरक्षा ऑडिट करा अशी मागणी साईनाथ दुर्गे यांनी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची कार्यवाहीदेखील प्रशासनाने तातडीने करावी अशी मागणीही त्यांनी केली. एखाद्या वेळी दुर्घटना घडल्यास तिचा सामना करता यावा यासाठी शिक्षक, विद्यार्थ्यांसह कर्मचारी, सुरक्षा रक्षकांनाही आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात यावे जेणेकरून मदतकार्य तातडीने सुरू होईल अशी मागणी शीतल म्हात्रे यांनी केली. यावेळी शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांच्या निर्देशानुसार ‘कमला मिल’ दुर्घटनेच्या दुसर्या दिवसापासूनच पालिकेच्या १२३४ शाळांच्या फायर ऑडिटला सुरुवात झाल्याची माहिती प्रशासनाद्वारे देण्यात आली. यामध्ये ३० शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्याचे काम सुरू करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. यामध्ये अग्निशमन दल कर्मचारी आणि तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.