पक्षांतर केलेल्या मनसेच्या नगरसेवकांना संधी -
मुंबई | प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेच्या विविध समित्यांच्या निवडणूका एप्रिल महिन्यात होतात. त्याआधी समितीमधील अर्ध्या सदस्यांची निवृत्ती दरवर्षी मार्चपूर्वी केली जाते. तिजोरीच्या चाव्या हातात असलेल्या स्थायी समितीमधून २७ पैकी १३ सदस्यांची निवृत्ती होणार आहे. चिठ्ठ्याद्वारे निर्णय घेतला जाणार असल्याने सदस्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या जागेवर मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांची वर्णी लागणार असल्याचे माहिती उपलब्ध झाली आहे.
मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प २६ हजार कोटींचा आहे. सर्व आर्थिकबाबींचे निर्णय घेण्याचे अधिकार स्थायी समितीला आहेत. यामुळे या समितीवर अापली वर्णी लागावी, अशी सर्व नगरसेवकांची इच्छा असते. स्थायी समितीत २७ सदस्य आहेत. त्यापैकी १३ सदस्यांची दरवर्षी नव्याने निवड केली जाते. ही निवड करण्यापूर्वी जून्या सदस्यांची निवृत्ती करावी लागते. चिठ्ठ्यांद्वारे हा निर्णय घेतला जातो. यंदा ही अशाप्रकारे निवृत्ती केली जाणार आहे. स्थायी समितीच्या येत्या बैठकीत निवृत्त आणि राहिलेले अशा दोन प्रकारच्या चिठ्ठ्या सदस्यांद्वारे काढल्या जातील. दरम्यान, निवृत्त असलेली चिठ्ठी काढणाऱ्या सदस्याला स्थायी समितीतून पायउतार व्हावे लागणार आहे.
मनसेला जय महाराष्ट्र करुन शिवसेनेत प्रवेश केलेल्या मनसेच्या सहा नगरसेवकांमुळे शिवसेनेचे पक्षीयबळ वाढले आहे. यामुळे प्रत्येक समितीत शिवसेनेचा एक सदस्य वाढणार आहे. पालिकेच्या चार वैधानिक व विशेष समित्या आहेत. समित्यांमधील या वाढीव जागेवर मनसेतून आलेल्या सहा नगरसेवकांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सहा नगरसेवकांची वर्णी समित्यांवर लावल्यावर उरलेल्या समित्यांवर शिवसेनेला आणखी एका सदस्याची निवड करता येणार आहे. यामुळे मनसेमधून शिवसेनेत आलेल्या नगरसेवकांमुळे शिवसेनेला आपल्या नगरसेवक आणि नामनिर्देशित सदस्यांची वर्णी लावण्याची संधी निर्माण झाली आहे.