मुंबई - मुंबईतील काळबादेवी परिसरातील नागरिकांच्या अग्निसुरक्षेच्या दृष्टिकोनातून या परिसरातील सुवर्ण कारागिरांनी उद्योग स्थलांतर करावा. मुंबई महापालिकेने यासंदर्भात बैठक घेऊन कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मंत्रालयात झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिनात काळबादेवी भागात राहणारे हरकिशन गोरडिया यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी हा उद्योग अन्यत्र स्थलांतरित करण्याबाबत संबंधितांना नोटीस देण्याच्या सूचना दिल्या. काळबादेवी परिसरातील घरांमध्ये सुवर्णकार कारागिरांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. तेथे भट्ट्या, धुराच्या चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथे धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचत असून व्यवसायासाठी भट्ट्यांचा वापर होत असल्याने अग्निसुरक्षेची काळजी पुरेशा प्रमाणात घेतली जात नसल्याची तक्रार गोरडिया यांनी केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री म्हणाले, नागरिकांच्या अग्निसुरक्षेच्या कारणावरुन मुंबादेवी, काळबादेवी परिसरातील हा व्यवसाय मुंबई परिसरातच स्थलांतर करावा. या व्यवसायिकांना तीन महिन्याची नोटीस द्यावी. मुंबई महापालिकेने या संदर्भात बैठक घेऊन त्यातून मार्ग काढावा.