औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीस महाविद्यालयांतर्गत असणाऱ्या कर्करोग निदान केंद्रातील पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या ते तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या कनिष्ठ निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात सुधारणा करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयांसह, शैक्षणिक रुग्णालयांमध्ये रुग्णांना चांगले उपचार मिळावे याकरिता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची सेवा उपलब्ध होण्यासाठी 31 जानेवारी 1996 च्या शासन निर्णयानुसार निवासी योजना लागू करण्यात आली आहे. यानुसार निवासी डॉक्टरांना त्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी विद्यावेतन देण्यात येते. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत येणाऱ्या कर्करोग निदान केंद्राकरिता कनिष्ठ निवासी 1, 2 आणि 3 या 72 पदांची निर्मिती करण्यात आली होती. परंत, त्यांना देण्यात येणारे विद्यावेतन आणि इतर शासकीय महाविद्यालयातील विद्यावेतनातील तफावत दूर करून ती समान पातळीवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत कर्करोग निदान केंद्रातील कनिष्ठ निवासी डॉक्टरांना आता सुधारित विद्यावेतन देण्यात येणार आहे. त्यासाठीच्या अंदाजे 4 कोटी 60 लाख 53 हजार 792 इतक्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आली.