मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेकडून निवडणूक जिंकलेल्या सात पैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेनेत प्रवेश केला. यामुळे मनसेने आपल्या फुटीर नगरसेवकांविरोधात कोंकण आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीबाबत कोंकण आयुक्तांकडे ऑक्टोबरपासून तारखा दिल्या जात आहेत. याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मंगळवारी याबाबतची सुनावणी असताना पुन्हा पुढील तारीख देण्यात आली आहे. मनसेच्या नगरसेवकांना सुनावणीसाठी तारीख पे तारीख दिली जात असल्याची चर्चा आहे.
भाजपने शिवसेनेला दिलेल्या आव्हानामुळे मनसेचे पालिकेतील गटनेते दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, हर्षला मोरे, अश्विनी माटेकर, परमेश्वर कदम, आणि अर्चना भालेराव यांनी मनसेतून फुटून शिवसेनेत प्रवेश केला होता. १३ ऑक्टोबर २०१७ मध्ये या नगरसेवकांनी पक्षांतर केले होते. शिवसेनेची ही खेळी भाजपसह मनसेच्या जिव्हारी लागली. मनसेने कायदेशीर मार्ग पत्करून फुटीर नगरसेवकांची कोंडी करण्यावर भर दिला. या घटनेला चार महिने उलटून गेले. तरी नगरसेवकांच्या पक्षांतराबाबत कोकण विभागीय आयुक्तांकडून अंतिम निर्णय अद्याप दिलेला नाही. ११ जानेवारी २०१८ रोजी कोकण विभागीय मुंबई कार्यालायात आयुक्तांसमोर एक सुनावणी घेण्यात आली. यावेळी दोन्ही पक्षाच्या वकिलांनी बाजू मांडताना नगरसेवकांवर दावा केला. या युक्तीवादाच्या तपशीलावर कोकण विभागीय आयुक्त मंगळवारी निर्णय जाहीर करणार होते. मात्र, निवडणुक अधिकारी उपस्थित राहीले नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच पुढील सुनावणी बाबत वेळ व तारीखा ठरविल्या जातील, अशी माहिती कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांनी दिली.