नवी दिल्ली - पुण्यातील सर्वेश सुभाष नावंदे याला वायुदल विंगचा सर्वोत्कृष्ट कॅडेटचे सुवर्ण पदक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी ‘प्रधानमंत्री रॅली’ मध्ये आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. दिल्लीतील छावणी भागातील करीअप्पा परेड ग्राउंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी ‘प्रधानमंत्री रॅली’चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कॅडेट्सना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी संरक्षणमंत्री निर्मला सितारमन, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत, एअर चिफ मार्शल बिरेंद्र सिंग धनोआ, ॲडमिरल सुनील लांभा आदी मंचावर उपस्थित होते.
एनसीसीच्या श्रेणी अंतर्गत पुण्याच्या सर्वेश सुभाष नावंदे यास वायुदल विंगचा सर्वोत्कृष्ट कॅडेटचे सुवर्ण पदक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सर्वेश हा १९ वर्षांचा असून तो मॉडर्न कॉलेज पुणे येथे बी एससी द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. प्रजासत्ताक दिन2018 च्या राजपथावरील पथसंचलनात सहभागी होण्यासाठी पुणे येथे नाव नोंदविले. नोव्हेंबर 2017 मध्ये पुणे विभागातून सर्वेशची निवड पुढील शिबिरासाठी औरंगाबाद येथे झाली. यानंतर एनसीसी शिबिरामध्ये होणाऱ्या विविध अंतर्गत स्पर्धांमध्ये तो उत्तीर्ण होत गेला. अंतिमत: तो‘प्रधानमंत्री रॅली’ साठी पात्र ठरला. सर्वेशची उत्कृष्ट कॅडेट म्हणून निवड झाली. त्याने भारतातून वायुदल विंग मध्ये सर्वोत्कृष्ट कॅडेटचे सुवर्ण पदकही प्राप्त केले. एनसीसीचे महासंचालक यांनीही सर्वेशचा ट्रॉफी देऊन सत्कार केला.
एनसीसी महासंचालनालय आणि दिल्ली संचालनालयाच्या वतीने येथील करीअप्पा परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील एनसीसी कॅडेटसाठी शिबिराचे आयोजन करयात येते. 6 जानेवारी पासून या शिबिराला सुरुवात झाली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. तर प्रधामंत्री रॅलीने रविवारी या शिबिराची सांगता झाली. देशभरातील १७ एनसीसी संचालनालयाचे कॅडेट्स यात सहभागी झाले. महाराष्ट्रातील ११२ एनसीसी कॅडेट्स या शिबिरात सहभागी झाले. यातील काही कॅडेट्सची प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी तर काही कॅडेट्सची प्रधानमंत्री रॅलीमधे मानवंदना देण्यासाठी निवड झाली.
या शिबिरात दररोज पथसंचलनाचा सराव आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ड्रिल कॉम्पिटिशन, राष्ट्रीय एकात्मता जागरुकता कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, राजपथ पथसंचलन निवड स्पर्धा, प्रधानमंत्री रॅलीसाठी मानवंदना निवड स्पर्धेत महाराष्ट्रातील कॅडेट्सनी उत्तम कामगिरी बजावली.