नाशिक-अहमदनगर जिल्ह्यातील सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी सातपैकी सहा आरोपींना दोषी ठरवत एकाची निर्दोष मुक्तता केली आहे. सफाई कर्मचाऱ्यासोबत कुटुंबातील मुलीचे प्रेमसंबंध असल्यामुळे दरंदले कुटुंबातील मुलीचे वडील, भाऊ आणि दोन काका यांनी दोन साथीदारांच्या मदतीने कट रचून संगनमताने तिघांची निर्घृण हत्या केल्याचे सिद्ध झाल्याचे न्यायाधीश वैष्णव यांनी यावेळी जाहीर केले. मात्र, अशोक फालके या संशयित आरोपीविरुद्ध परिस्थितिजन्य पुरावे नसल्याने त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. उर्वरित सहा जणांची शिक्षा येत्या १८ जानेवारीस सुनावण्यात येणार आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा हे हत्याकांड आंतरजातीय प्रेम प्रकरणातून झाल्याचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरल्याने आता या आरोपींना फाशीची शिक्षा होणार की जन्मठेप याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
१ जानेवारी २०१३ रोजी झालेल्या या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. न्यायाधीश वैष्णव यांनी या खटल्यात संशयित मुलीचे वडील पोपट दरंदले, भाऊ गणेश, काका प्रकाश आणि रमेश, आत्येभाऊ संदीप कुऱ्हे यांना दोषी ठरवले, तर मावसा अशोक फलके याच्याविरोधात पुरेसा पुरावा आढळून न आल्याने त्यांना निर्दोष ठरविले. नेवासा फाटा येथील बीएड कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीचे त्यात संस्थेत सफाई कर्मचारी म्हणून कामास असलेल्या सचिनसोबतच्या प्रेमसंबंधातून ही तिहेरी हत्या झाल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. यास विरोध म्हणून मुलीच्या नातलगांनी सचिन आणि त्याचे मित्र राहूल आणि संदीप अशी तिघांची अमानुष हत्या केली. सचिनवरील रागामुळे गवत कापण्याच्या विळ्याने त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते शेतातील विहिरीत आणि बोरवेलमध्ये टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तर, संदीपचा मृतदेह सेफ्टीक टँकमध्ये टाकून टाकीत बुडून त्याचा आकस्मात मृत्यू झाल्याचा बनाव तयार करण्यात आला होता.
नेवासा सत्र न्यायालयात खटला सुरू असताना साक्षीदारांवर दबाव येऊ लागल्याने खटला अन्य जिल्ह्यात चालविण्याची विनंती मृत संदीपचा भाऊ लष्करी जवान पंकजने औरंगाबाद न्यायालयात याचिकेद्वारे केला. त्यानुसार हा खटला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर गेले दिड व र्षांपासून जिल्हा व सत्र न्यायाधीश वैष्णव यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज चालले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ५३ साक्षीदार तपासले. १ जानेवारीस आरोपींच्या युक्तिवादाला उत्तर दिल्यावर १५ जानेवारीस या खटल्याची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार न्यायाधीश वैष्णव यांनी फालके वगळून अन्य सहा आरोपीं यात दोषी असल्यावर आज शिक्कामोर्तब केले.