मुंबई । प्रतिनिधी - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वंशजांचे विविध प्रश्नांसाठी आझाद मैदान येथे एकदिवसीय उपोषण सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी अजित पवार यांनी उपोषणकर्त्यांचे प्रश्न जाणून घेतले व सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे प्रश्न मांडणार असल्याची ग्वाही दिली. या भेटीदरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार नसीम खान आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या वंशजांनी भिमा कोरेगाव प्रकरणातील मुख्य आरोपी मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना तात्काळ अटक करावी, लहुजी साळवे अभ्यास आयोगाची अंमलबजावणी करावी व अनुसूचित जाती जमातीसाठी निर्माण केलेले आर्थिक विकास महामंडळे पुर्ववत चालू करावे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीगुरु लहुजी साळवे या महामानवांचे स्मारक तात्काळ उभे करण्यात यावे अशा मागण्या केल्या. यावर अजित पवार म्हणाले की सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. सरकारच्या प्रत्येक विभागाबाबत या अधिवेशनात चर्चा पार पडेल. समाज कल्याण खात्याची ज्यावेळी चर्चा घडेल त्यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या वंशजांनी मांडलेले प्रश्न नक्कीच सभाग्रुहात उपस्थित करेल असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान अजित पवार यांनी आझाद मैदान परिसरात सुरू असलेल्या इतर आंदोलकांचीही भेट दिली. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरकार आले तर सर्व आंदोलकांचे प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.