मुंबई | प्रतिनिधी - बेस्ट बसगाडयांमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध तसेच खरेदी केलेल्या तिकिटाने प्रमाणित केलेल्या अंतरापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध उघडण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सप्टेंबर ते डिसेंबर, २०१७ या चार महिन्यात एकूण १४ हजार १३४ प्रवासी आढळले असून त्यांच्याकडून १२ लाख ७४ हजार २२८ रुपये इतकी रक्कम दंडापोटी वसूल करण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाद्वारे कळविण्यात आले आहे.
विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रवास भाडे अधिक देय प्रवासी भाडे रकमेच्या दहापट भरणा करण्याचे नाकारल्यास, मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलाम ४६० (ड ) अन्वये एक महिना पोलीस कोठडी किंवा २०० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्रितपणे देण्याची तरतूद आहे. बसमधून प्रवास करताना योग्य तिकीट खरेदी करणे हे प्रत्येकाला बंधनकारक असून विना तिकीट प्रवास करणे हा सामाजिक गुन्हा देखील आहे. तरी सर्व बसप्रवाशांनी आपले आर्थिक नुकसान आणि मानहानी टाळण्यासाठी योग्य तिकीट अथवा वैध बसपास घेऊन, तिकीट व बसपासवर प्रमाणित केल्याप्रमाणे प्रवास करावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात आले आहे.