अमरावती - देशातील मागासवर्गीयांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी अपयशी ठरलेल्या मोदी सरकारने राजीनामा द्यावा ,भीमा कोरेगाव येथील दंगलीतील आरोपी मिलिंद एकबोटे मनोहर भिडे यांना त्वरीत अटक करावी तसेच या मागणीसह भीम आर्मी संस्थापक अॅड चंद्रशेखर आझाद यांच्यावरील रासुका कारवाईच्या निषेधार्थ शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र भर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भीम आर्मी भारत एकता मिशनचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. उत्तर प्रदेशात सहारनपूर येथे याच विषयावर रविवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी आंदोलन होत असून देशभरात देखील आपल्या संघटनेच्या वतीने आंदोलने होणार असल्याची माहिती कांबळे यांनी यावेळी बोलतांना दिली.
अशोक कांबळे विदर्भाच्या दौ-यावर असून आज अमरावती जिल्हा येथील संघटनेच्या वाटचालीसंदर्भात त्यांनी पदाधिका-यांसोबत बैठक घेतली.या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रात तसेच देशभरात मागासवर्गीयांवर सुरू असलेल्या अन्याय अत्याचाराबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. केंद्राने नव्याने अॅट्राॅसिटी कायदा आणला असला तरी आरोपींवर त्याचा धाक राहिलेला नाही शिवाय हा कायदा राबविणारेदेखील सक्षम नाहीत किंवात्यांची मानसिकता दिसत नसल्याची टीका कांबळे यांनी केली.आज महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश मध्य प्रदेश उत्तराखंड,किंवा ज्या ज्या प्रदेशात भाजपचे सरकार आहे अशा सर्वच प्रदेशात मागासवर्गीय सुरक्षित नाहीत.त्यांच्या सुरक्षिततेसह सामाजिक आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी कोणत्याही उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणल्या जात नसल्याचे कांबळे म्हणाले.
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव व वढू येथील हिंसाचारास जबाबदार हिंदू एकता आघाडी चे मिलिंद एकबोटे व शिवप्रतिष्ठानचे मनोहर भिडे यांच्याविरोधात भीम आर्मी न्यायालयीन लढाई लढत आहे.एकबोटे यांचा जामीन रद्द करण्यासाठी भीम आर्मी सर्वोच्च न्यायालयात लढा देणार आहे. परंतु गुन्हे दाखल असूनही या दोन्ही आरोपींना अटक करण्यास राज्य सरकार धजावत नाही. लोकशाही पद्धतीने आंदोलने करणा-या भीमसैनिकांवर मात्र गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबले जात असून सरकारच्या या दुहेरी भूमिकेचा आम्ही तीव्र निषेध करीत असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
देशातील दलित अत्याचारावर त्वरीत पायबंद घालावा, अॅड चंद्रशेखर आझाद यांच्यावरील अन्यायकारक राहुकाल संपवून त्यांना तुरूगातून त्वरीत मुक्त करावे. भीमसैनिकांवरील खोटे गुन्हे मागे घेऊन त्यांना सोडण्यात यावे. मिलिंद एकबोटे व मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना त्वरीत अटक करावी. मागासवर्गीयांच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी यासह इतर मागण्यांसाठी भीम आर्मी येत्या शनिवारी राज्यभर आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदने देणार आहे असे कांबळे यांनी सांगितले.