मुंबई | प्रतिनिधी -
दोन उड्डाणपूलांची पूनर्बांधणी होत नाही, तोपर्यंत महालक्ष्मी उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम होणार नसल्याची स्थिती आहे. या पेचामुळे धोकादायक स्थितीत असलेला आणि शंभर वर्षे पूर्ण झालेला महालक्ष्मी उड्डाणपूल पुनर्बांधणीच्या प्रतिक्षेत राहणार असल्याने पुलाचे काम रखडणार आहे.
मुंबईतील जुन्या सर्वच्या सर्व उड्डाणपूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटची कामे सुरू आहेत. त्यात ब्रिटीशकालीन असलेल्या महालक्ष्मी पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचा हमी कालावधी संपला आहे. धोबी घाट ते वरळी नाका आणि केशवराव खाडे मार्ग ते ई मोजेस रोड हे दोन उड्डाणपूल महालक्ष्मी उड्डाणपूलाच्या लगत बांधले जाणार आहेत. या ठिकाणच्या जुन्या पुलांची पूनर्बांधणी केली जाणार आहे. या दोन पूलांची पूनर्बांधणी झाल्याशिवाय महालक्ष्मी पूल तोडता येणार नाही. या भागातील नागरिकांची अडचण होवू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. महालक्ष्मी उड्डाणपूल पश्चिम रेल्वे पार करून केशवराव खाडे मार्ग ते रेसकोर्स, हाजी अली असा बांधण्यात येणार आहे. मात्र या पूलाची मोठी अडचण झाली आहे. हा पूल तोडल्यास स्थानिक नागरिकांची अडचण होणार आहे. त्यामुळे तो लटकला आहे. दरम्यान हॅकॉक उड्डाणपूलही लटकला आहे. कर्णाक उड्डाणपूलाच्या पुनर्बाधणीसाठी केंद्र सरकारच्या परवानग्या मिळाल्या आहेत. रेल्वेनेही पुनर्बांधणीसाठी परवानगी दिली आहे. परवानग्या मिळूनही या उड्डाणपूलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. मात्र हॅकॉक उड्डाणपूलाचे काम होत नाही तोवर कर्णाक उड्डाणपूलाचे काम करता येणार नाही. त्यामुळे दोन्ही उड्डाणपूलांची कामे जैसे थे असल्याची माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली.