मुंबई । प्रतिनिधी - उत्तप्रदेशातील संतलाल पाल याच्या डोक्यावर डोक्याच्या आकारा इतकीच मोठी गाठ (ट्युमर) निर्माण झाली होती. या ‘ट्युमर’चा आकार वाढतच चालला होता. मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात संतलालवर जटिल शस्त्रक्रिया करून मेंदुमधील १ किलो ८४३ ग्रॅम वजनाची गाठ (ट्युमर) काढण्यात यश आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.
३१ वर्षीय संतलाल पाल हा कापड विक्रेता बाई य. ल. नायर चॅरिटेबल रुग्णालय आणि टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेजच्या न्युरोसर्जरी (मज्जातंतू शल्यचिकित्सा) विभागात डोकेदुखीमुळे दाखल झाला होता. रुग्णाच्या सीटी आणि मेंदुच्या एमआर स्कॅनची तपासणी करण्यात आली तसेच टय़ुमरचा रक्तुपरवठा अभ्यास करण्यासाठी विशिष्ट सीटी ऍन्जिओग्राफी करण्यात आली. त्या तपासणीत कवटीच्या हाडांद्वारे मिडलाइनच्या दोन्ही बाजूंवर ३० x ३० x २० सें.मी.ची गाठ पसरली होती. या गाठीमुळे डोक्यावर जडपणा व दृष्टीदोषात वाढ होऊन अंधत्व आले होते. नायर हॉस्पिटलमधील न्युरोसर्जरीचे प्रमुख डॉ. त्रिमुर्ती डी. नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ब्रेन टय़ुमरची शस्त्रक्रिया करण्यात आली. सदर शस्त्रक्रिया सात तास चालली. यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे गाठीचे निर्मुलन करण्यात आले. रुग्णाला रक्तसंक्रमणाची ११ युनिट रक्त दिले गेले. टय़ुमरचे वजन १ किलो ८७३ ग्रॅम होते, जे जगातल्या यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे काढलेल्या मेंदू टय़ुमरचे सर्वांत मोठे वजन आहे. शस्त्रक्रिया ही मोठी आव्हानात्मक होती. उत्कृष्ट पेरीऑपरेटीव्ह मॉनिटरिंगमुळे रुग्णावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात पालिका डॉक्टरांना यश आले आहे.
अशाप्रकारच्या मेंदुच्या गाठीचे याअगोदर नोंदविलेले वजन १.४ किलोग्रॅम इतके होते. नायर रुग्णालय अशा जटिल शस्त्रक्रिया व्यवस्थापन आणि उत्तम आरोग्य सेवा आणि सुविधा देण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी मत व्यक्त केले. नायर रुग्णालयाच्या मेंदूविकार शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. त्रिमुर्ती नाडकर्णी म्हणाले, “मेंदूत गाठ असलेले अनेक रुग्ण आपल्याकडे येतात. परंतु, संतलालची केस खूपच वेगळी होती. या तरूणाच्या डोक्यावर डोक्याच्या आकाराची गाठ होती. आम्ही यापूर्वी शस्त्रक्रिया करून अनेक गाठी काढल्यात. पण, या गाठीवर शस्त्रक्रिया करणं खूपच अवघड होतं.” “डोक्यातील रक्तवाहिन्या या गाठीत पसरल्या होत्या. संतलालची प्रकृती चिंताजनक होती. हिमोग्लोबिन फक्त ७ ग्रॅम इतकंच होतं. त्यामुळे तातडीने ११ युनिट रक्त चढवण्यात आलं. त्यानंतरच शस्त्रक्रिया करून तब्बल १.८७३ किलोची गाठ काढण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर तीन दिवस संतलाल व्हेंटिलेटरवर होता. आता त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.” हा ब्रेन ट्युमर साधा आहे किंवा कॅन्सरचा हे तपासण्यासाठी नमुने पाठवण्यात आले असून लवकरच याचा अहवालही प्राप्त होईल, असंही डॉ. नाडकर्णी यांनी सांगितलं.