ठाणे । प्रतिनिधी -
भारतात कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यापैकी ७० टक्के रुग्ण पुढील टप्प्यावरील आहेत. परिणामी कर्करोगमुक्त रुग्णांचे प्रमाण कमी असून कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. भारतातील ६ टक्के मृत्यू कर्करोगामुळे होतात. कर्करोगामुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूंचा विचार करता हे प्रमाण ८ टक्के आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयएमसीआर) आकडेवारीनुसार पुरुषांमध्ये तोंडाचा, घशाचा, अन्ननलिका, पोट, फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आढळते तर महिलांमध्ये गर्भाशय ग्रीवा, स्तन, तोंड, अन्ननलिकेच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असते. स्थानिक पातळीवर कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करता यावेत, यासाठी मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. आशीष जोशी, डॉ. वशिष्ठ मणियार, डॉ. प्रीतम काळसकर, डॉ. क्षितिज जोशी, डॉ. प्रदीप केंद्रे यांनी घाटकोपर, बोरिवली, विलेपार्ले आणि ठाणे येथे मुंबई ऑन्कोलॉजिकल सेंटर सुरू केले. या ऑन्को उपचार केंद्रांत तज्ज्ञ आणि प्रशिक्षिक नर्सिंग कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली बाह्यरुग्ण आरोग्य सेवा, केमोथेरपी, सहाय्यक औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येतात. या केंद्रांमध्ये केमोथेरपी अॅडमिनिस्ट्रेशन, ब्लड ट्रान्सफ्युजन, चाचण्यांशी संबंधित कामे, हेमेटॉलॉजिकल उपचार, बोन मॅरो अॅस्पिरेशन आणि बायोप्सी, तसेच इतर सर्व आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.