बेस्ट एम्ल्पॉईज युनियनची मागणी -
मुंबई । प्रतिनिधी -
बेस्ट उपक्रमात अधिकारी, कर्मचारी यांचा जाच केला जात आहे. अशाच जाचाला कंटाळून वरळी आगारातील बस निरीक्षकाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न नुकताच केला.त्यांच्यावर पालिकेच्या केईएम रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल करुन कठोर कारवाई करावी, अशी मागणी बेस्ट एम्ल्पॉईज युनियनने केली आहे.
बेस्टच्या वरळी आगारात सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बस निरीक्षक आडारकर यांनी आगार विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. आगार व्यवस्थापक, सहाय्यक वाहतूक अधिकारी आणि आगार अधिकारी आपल्या मर्जीनेप्रमाणे कामगारांना वागणूक दिली जात आहे. विनाकारण त्रास देणे, रजा मंजूर न करणे, घरापासून दूरच्या आगारात ड्युटी लावण्याचा प्रकार मागील कित्येक वर्षापासून सुरु आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. परंतु, अधिकाऱ्यांच्या मनमानीला आळा घालण्यास बेस्ट प्रशासनाला व बेस्ट समिती अध्यक्षांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांची मनमानी वाढली आहे. मर्जीतील कामगारांना हे अधिकारी योग्य वागणूक देत आहेत. तर मर्जीत न राहणाऱ्या जाचक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दिवसेंदिवस यात वाढ होऊ लागल्याने अनेक कामगार वैतागले आहेत. त्यापैकी आडारकर यांनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कामगारांचा नाहक, मानसिक छळ करून, त्यांचे जगणे हराम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. आडारकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या वरळी आगारातील व्यवस्थापक, वाहतूक अधिकारी व अागार अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल करावा, अशी मागणी युनियनचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांचा बंदोबस्त न केल्यास आणखी कामगारांना आत्महत्येस प्रवृत केले जाईल. त्यामुळे बेस्ट महाव्यवस्थापक आणि समिती अध्यक्षांन लक्ष घालावे व आडारकर यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.