मुंबई । प्रतिनिधी - मुंबईचा समुद्र, खाडी किनारे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, गोरेगाव येथील आरे वसाहत, मलबार हिल अशा ठिकाणी असलेली जैव विविधता म्हणजेच दुर्मिळ वनस्पती आणि जीव यांचे जतन करण्यासाठी महापालिकेची जैव विविधता व्यवस्थापन समिती लवकरच तयार होणार आहे. या समितीमध्ये खासदार अरविंद सावंत आणि आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व शहरांमध्ये जैव विविधता समिती स्थापन केली जाणार आहे. मुंबईतील जैव विविधतेचा अभ्यास करुन त्याचे जतन करण्यासाठी महानगर पालिकेची समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीसाठी शुक्रवारी नावे जाहीर करण्यात आली. ही समिती मुंबईतील जैव विविधेतेचा शास्त्रीय पध्दतीने अभ्यास करुन त्याची नोंद केली जाणार आहे. तसेच ही जैव विविधता जपण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच कोणत्या प्रकारची जैव विविधता अस्तीत्वात आहे याची शासकीय माहिती मुंबईत उपलब्ध होऊ शकणार आहे.
महापालिका अतिरीक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीत ७ नगरसेवक आणि ७ विविध खात्यांचे प्रमुख आणि ७ तज्ञांचाही समावेश करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या वतीने किशोरी पेडणेकर, ऋतुजा तारी, प्रतिमा खोपडे यांना समितीवर नियुक्ती झाली असल्याची माहिती सभागृह नेते यशवंत जाधव यांनी दिली. संबंधित नावे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सभागृहात जाहीर केली. या समितीमुळे जैव विविधतेच्या विकासा बरोबरच संशोधनालाही चालना मिळणार आहे. ही समिती नियुक्त करण्याचा प्रस्ताव पालिका सभागृहात शुक्रवारी मांडण्यात आला होता. सरकारी प्रकल्पांसाठी मुंबईतील जैव विविधतेचा सरकारी अभ्यास केला जातो. मात्र,पहिल्यांदाच जैव विविधता जपण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहेत. यातून जैव विविधेतच्या संशोधनलाही चालना मिळू शकणार आहे.