मुंबई - मुंबई महापालिका मुख्यालयाच्या सुरक्षा रक्षकांविरोधात एका निनावी पत्राद्वारे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने २० पेक्षा अधिक सुरक्षा रक्षकांच्या बदल्या प्रशासनाने केल्या आहेत. त्यामुळे मुख्यालयातील सुरक्षा रक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. उप प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांनी सूडाच्या भावनेतून ही बदली केली असल्याचा आरोप सुरक्षा रक्षकांनी केला आहे.
पालिका मुख्यालयात महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, पालिका आयुक्त, विविध समित्यांचे अध्यक्ष, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, विविध विभागांचे खाते प्रमुख यांची कार्यालये आहेत. यांना भेटण्यासाठी दररोज व्हीआयपी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, बिल्डर, कंत्राटदार, नागरिक येत असतात. त्यामुळे पालिका मुख्यालयाच्या सुरक्षेसाठी विविध विभाग, सर्व प्रवेशद्वारावर, हवालदार, जमादार, शिपाई, असे तब्बल १०० सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. मुख्यालयात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आपल्याकडे पैशांची मागणी केल्याचे एका बिल्डरचे निनावी पत्र अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे आले. त्या पात्राच्या अनुषंगाने २० सुरक्षा राक्षकांच्या अचानक बदल्या करण्यात आल्या आहेत.
उप प्रमुख सुरक्षा अधिकारी अभय चौबळ आणि सहाय्यक सुरक्षा अधिकारी सूरज शेडगे यांनी गेल्या काही काळापासून मनमानी सुरू केली असून त्यांनीच अतिरिक्त आयुक्तांची दिशाभूल करून या बदल्या करून घेतला असल्याचा आरोप कामगार सेनेच्या वतीने राम लिंबारे यांनी केला आहे. प्रत्यक्षात हे पत्र चौबळ यांनीच लिहिले असल्याचा आरोप कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या पत्रामुळेच या बदल्या केल्या असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हे सुरक्षा रक्षक २0 वर्षे इथे काम करत असून त्यांना त्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना या पद्धतीने हटवणे अयोग्य असल्याचेही मत त्यांनी मांडले आहे.
चौबळ यांचीच बदली करा -
अतिरिक्त आयुक्तांकडे आलेल्या पत्राची पोलीस चौकशी करा. या चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करा. सुरक्षा रक्षकांच्या बदल्या ताबडतोब रद्द करा आणि कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देणाऱ्या चौबळ यांचीच बदली करा अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे संघटक रामचंद्र लिंबारे आणि चिटणीस प्रकाश वागधरे यांनी केली आहे.