मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेची कामे मिळवण्यासाठी कंत्राटदार ५० टक्क्याहून कमी दर नमूद करून कामे मिळवीत आहेत. याप्रकारामुळे कामाचा दर्जा राखला जात नसून निकृष्ट दर्जाची कामी होत आहेत. त्यामुळे ५० टक्क्याहून कमी दराच्या निविदा भरून कामे मिळवणाऱ्या कंत्राटदारांच्या कामाची गुणवत्ता दक्षता पथकाद्वारे तपासण्यात यावी अशी मागणी भाजपा नगरसेवक संदीप पटेल यांनी केली आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून कामे करताना, सामान किंवा वस्तू पुरवठा करताना नोंदणीकृत कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात येतात. आलेल्या निविदांमधून सर्वात कमी बोली लावणाऱ्या कंत्राटदाराला काम दिले जाते. कंत्राटे मिळवण्यासाठी कंत्राटदारांमध्ये खूप चढाओढ असल्याने जास्तीत जास्त कमी किंम्मत नमूद करून कामे मिळवली जातात. सध्या कामाच्या अंदाजित दरापेक्षा ५० टक्क्याहून कमी दर नमूद केले जात आहेत. अशा वेळी कामाचा दर्जा राखला जात नसून निकृष्ट दर्जाची कामे केली जातात. परिणामी करदात्यांकडून प्राप्त होणाऱ्या महसूलातून विकास कामांवर केला जाणारा खर्च वाया जाण्याची तसेच निकृष्ट कामांमुळे अपघात होऊन नागरिकांच्या जिवाला धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेद्वारे करण्यात येणाऱ्या विकास कामांवर दक्षता पथकाकडून पाहणी करण्यात येते, त्याचप्रमाणे ज्या कंत्राटदारांनी ५० टक्के किंवा त्यापेक्षा कमी दर नमूद करून कंत्राटे मिळवली आहेत त्यांच्या कामांवर दक्षता पथकाकडून निरीक्षण करून कामाची पूर्तता व गुणवत्ता तपासण्यात यावी. जेणेकरुदक्षता पथकाच्या भितीने कामे गुणवत्तापूर्वक केली जातील व महापालिकेच्या महसुलाचे योग्य विनियोग करता येऊ शकतो असे संदीप पटेल यांनी म्हटले आहे. या मागणीसाठी पटेल यांनी ठरावाची सूचना मांडली आहे. या ठरावाच्या यासूचनेला पालिका सभागृहात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.