आतापर्यंत 65 चिमण्या पालिकेने काढल्या -
मुंबई । प्रतिनिधी -
कमला मिल कंपाऊंडमधील आग दुर्घटनेनंतर महापालिकेने मुंबईत सर्वत्र कारवाई सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून काळबादेवी येथील सोने - चांदी गाळणा-या चिमण्यांवर पालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 65 चिमण्यां पालिकेने काढल्या आहेत. मार्च अखेर पर्यंत 700 चिमण्या काढण्याचा निर्णय़ पालिकेने घेतला आहे.
तीन वर्षापूर्वी काऴबादेवी येथे लागलेल्या भीषण आगीशी झुंज देणा-या चार अधिका-यांना शहिद व्हावे लागले. या दुर्घटनेनंतर येथील अरुंद गल्ल्या, दाटीवाटीने व्यवसाय लावणारे फेरीवाले तसेच अनधिकृतपणे सोने -चांदी गाळणा-या चिमण्यांवर पालिकेने कारवाईला सुरुवात केली. येथे सोने - चांदीच्या व्यावसायिकांनी या कारवाईला तीव्र विरोध केला. मात्र तरीही पालिकेने महिना -दीड महिने येथील कारवाईला सुरू ठेवली. त्यावेळी याठिकाणी 2 हजार 200 चिमण्या होत्या. मात्र यातील काही चिमण्या पालिकेने काढून टाकल्याने साडेसातशे चिमण्या उरल्या होत्या. मात्र त्यानंतर पालिकेची कारवाई थंडावल्याने अनधिकृत व्यावसायिकांनी पुन्हा आपले बस्तान बांधले. यांत साडे सातशे चिमण्याही पुन्हा सक्रीय झाल्या. त्यानंतर कमला मिल कंपाऊंड येथील आग दुर्घटनेनंतर अनधिकृत व्यावसायिकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऎरणीवर आला. अग्निसुरक्षेच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील चिमण्या काढून टाकण्याचे आदेश पालिकेला दिले. येथे सुमारे 750 चिमण्या असून या सर्व अनधिकृत आहेत. या सर्व चिमण्या येत्या 31 मार्चपर्यंत काढल्या जाणार आहेत. कमला मिल दुर्घटनेनंतर आता पर्यंत 65 चिमण्या पालिकेने काढल्या आहेत. पालिकेने 2013 साली येथील सर्वेक्षण सुरू केले. त्यावेळी येथे 2200 चिमण्या होत्या. मागील तीन वर्षात जवळपास 1500 चिमण्या पालिकेने काढून टाकल्या. आता तीन वर्षानंतर पुन्हा कारवाई सुरु केली आहे. येत्या दीड महिन्यांत 700 चिमण्यांवर कारवाई करण्याचे नियोजन पालिकेचे आहे. काळबादेवी, नारायणवाडी, विठ्ठलवाडी, झवेरी बाजार, जंजीकर मार्ग, पोपळेवाडी, तेलगल्ली, कॉटन एक्सचेंज मुंबादेवी परिसरातील रहिवासी शहरीकरणाच्या विस्तारामुऴे उपनगरांमध्ये विस्तारले व जागांवर सोन्या -चांदीच्या व्यवसायिकांनी बस्तान मांडले. येथे सोने घडणावळीचे तसेच दागिने पॉलिस करण्याचे करण्याचे काम सुरू झाले. मात्र या उद्योगामुळे परिसरात निर्माण होणा-या धुरामुळे येथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत होता. या निर्णयामुळे मागील अनेक वर्ष धुराच्या त्रासामुळे हैराण असणा-या रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.