मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई मेट्रो ३ प्रकल्पासाठी २ हजार ७४२ झाडे कापण्यात येणार आहेत. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीत याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून सादर करण्यात आला आहे.कॉंग्रेसचा झाडांच्या कत्तलीला ठाम विरोध आहे, अशी भूमिका मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी सोमवारी मुंबई कॉंग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. यामुळे येत्या ८ फेब्रवारीला वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत यावरून खडाजंगी होणार आहे.
मुंबईत मेट्रो ३ मुळे वाहतूक व्यवस्था सुरक्षित होणार असली तरी पर्यावरणावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. ठिकठिकाणी मेट्रोची कामे सुरु आहेत. मुंबईतील मोठा हरित पट्टा या प्रकल्पामुळे बाधित होणार आहे. पालिका प्रशासनाने २७४२ झाडे तोडण्याचा व ८९३ पूनर्रोपित करण्याचा प्रस्ताव वृक्ष समितीत सादर करणार आहे. १०० वर्षांहून जुने वृक्ष बाधित होणार आहेत. एकदा त्यांची तोड झाल्यास ते पुन्हा उगवणे शक्य नाही, किंवा ते पुनरोर्पित केल्यास जगत नाहीत, त्यामुळे त्यांचाही मृत्यूच होणार अाहे. कॉंग्रेसने या झाडे तोडणीला विरोध दर्शवला असून समितीत कॉंग्रेसच्या सदस्यांना वृक्ष तोडणीला कडाडून विरोध करण्याचे निर्देश दिले आहेत, असे निरुपम यांनी सांगितले. यावेळी आरेमधील मेट्रोच्या कारशेड साठी ४३१ झाडे तोडण्याचे प्रस्ताव नमूद असल्याचा दावा, निरुपम यांनी केला आहे. आरेमधील कारशेडला सर्वच स्तरातून विरोध होत आहे. शिवसेनेनेही मेट्रोच्या नावाखाली झाडांच्या कत्तलीला विरोध दर्शवला होता. मात्र, एकत्र येत झाडे तोडणीचे प्रस्ताव समितीत मंजुरीसाठी आणण्याचा घाट घालत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधानांनी झाडांची कत्तल रोखावी -
एकीकडे पर्यावरण वाचविण्याचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी देत आहेत. मात्र दुसरीकडे मुंबईत मेट्रोच्या माध्यमातून झाडांची कत्तल सुरु आहे. पंतप्रधान मोदींनी पर्यावरणाविषयी बोलू नये तर मेट्राे कामामुळे बाधित होणाऱ्या झाडांची कत्तल रोखावी, अशी मागणी निरुपम यांनी केली.