मुंबई । प्रतिनिधी -
जातीय विषमतेसारखे प्रश्न आजही कायम आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षीत असलेल्या समाजनिर्मितीसाठी लिखाण करण्याची गरज आहे. यासाठी पत्रकारांनी समाजाभिमुख लिखाण करावे, असे आवाहन करत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी पुढील वर्षीपासून सामाजिक न्याय खात्याच्या समता प्रतिष्ठानतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने 1 लाख रुपयांचा मूकनायक पुरस्कार सुरु करण्यात येणार असल्याची घोषणाही कार्यक्रमात केली. याबाबत मुकनायक पुरस्कार समितीचे अध्यक्ष राहुल पहुरकर यांनी समितीच्या वतीने सरकारने मुकनायक हा पुरस्कार सुरु करावा अशी मागणी केली होती तेव्हा बडोले यांनी तात्काळ मागणी पुर्ण करुन कार्यक्रमताच पुरस्कार सुरु करणार असल्याची घोषणा केली. वरिष्ठ संपादक मंदार फणसे यांना राज्यस्तरीय मूकनायक पुरस्काराने खामगाव येथे सन्मानित करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. मूकनायक राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार समितीच्या वतीने स्थानिक कोल्हटकर स्मारक मंदिर येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले होते तर प्रमुख अतिथी म्हणून आ.अॅड. आकाश फुंडकर, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य. अधिकारी ओमप्रकाश शेटे, दिलीप सानंदा, भारिप नेते अशोक सोनोने, जेष्ठ पत्रकार विनोद राऊत, राजेश राजोरे, मूकनायक राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार समितीचे अध्यक्ष राहुल पहुरकर यांची विचारमंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रथम महिला संपादिका तानूबाई बिरजे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविकात राहुल पहुरकर यांनी पुरस्कार सोहळ्यामागची भुमिका विषद केली. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वृत्तपत्र क्षेत्रातील योगदान तसेच मंदार फणसे यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा लघुपट स्क्रीनवर दाखविण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मूकनायक पुरस्काराने मंदार फणसे यांना सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी ओमप्रकाश शेटे यांचा कृतज्ञता सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांची समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अरविंद शिंगाडे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीधर ढगे पाटील यांनी केले. या कार्यक्रमा साठी पत्रकार अमोल गावंडे, ईश्वर ठाकूर, नाना हिवराळे, गिरीष राऊत, राहुल खंडारे, महेंद्र बनसोड, प्रफुल्ल खंडारे, निखिल शाह, शिवाजी भोसले, मंगेश तोमर, संदीप वानखडे, कुणाल देशपांडे, सुनील गुळवे यांनी पुढाकार घेतला.