मुंबई | प्रतिनिधी -
मुंबईतील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे पालिकेवर टिका केली जाते. पालिकेने आपल्यावर होणारी टिका कमी करण्यासाठी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडू नये याची काळजी घेण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे. मुंबईत जूनपासून पावसाळा सुरु होतो. पावसाळ्यादरम्यान पालिकेच्या परिमंडळ २ मध्ये परळ, दादर, माटुंगा, सायन, धारावी आदी भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. पावसाळ्यात पडणारे खड्डे बुजविण्यासाठी तब्बल १७ कोटी ४१ लाख रुपयांचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने केला असून स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केला आहे.
मुंबई महापालिका दरवर्षी मुंबईकरांना चांगले रस्ते उपलब्ध करण्यासाठी २ हजार कोटी रुपये खर्च करते. या रस्त्यांचा हमी कालावधी संपल्यानंतर रस्त्यांवर खड्डे पडल्यास खड्डे बुजविण्यासाठी दरवर्षी २०० कोटींपर्यंत खर्च केला जातो. पावसाळयात मुंबईतील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानुसार शहर भागातील परीमंडळ -२ मधील परळ, दादर , माटुंगा, सायन, धारावी या भागातील रस्त्यांवरील खड्डयांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पालिकेच्या रस्ते विभागामार्फ़त रस्त्यांवरील खड्डे, चौकांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या निविदेला तीन कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. मात्र हिरानी इंटरप्रायझेस या कंत्राटदाराने सर्वात कमी म्हणजेच १५ कोटी १० लाख ८१ हजार ४३८ रुपये इतक्या कमी रक्कमेत काम करण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे परिमंडळ २ मधील खड्डे बुजवण्याचे कंत्राट हिरानी इंटरप्रायझेसला कंत्राट देण्यात येणार आहे. या कामासाठी अन्य आकार व भौतिक सादिलवार इत्यादी खर्च पाहता एकूण १७ कोटी ४१ लाख रुपये खर्च केला जाणार असल्याने स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर खडाजंगी होण्याची शक्यता आहे.