मुंबई । प्रतिनिधी -
देश व विदेशातील पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ असलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय म्हणजे राणीच्या बागेला आंतरराष्ट्रीय दर्जाची बनवले जाणार आहे. त्यासाठी आगामी काळात तब्बल १२० कोटी रुपये खर्च केले जाणारा आहेत. त्यापैकी पालिकेच्या अर्थसंकल्पात यंदा ५० कोटी २५ लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.
५३ एकर जागेवर राणीबाग उभारण्यात आली आहे. राणी बागेला "आंतरराष्ट्रीय झू पार्क" बनविण्याचे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे व युवा नेते आदित्य ठाकरे यांचे स्वप्न आहे. मात्र या चांगल्या कामात विविध प्रकारे अडथळे आल्याने हे काम प्रलंबित राहिले. पालिकेने या राणी बागेच्या विकासाचे काम दोन टप्प्यात हाती घेतले आहे. आतापर्यंत पाहिल्या टप्प्यात, या राणीच्या बागेत काही छोट्या बागा, जापनीज गार्डन, गुलाबाचे उद्यान,देशातील पहिले इंटरप्रिटेशन सेंटर इमारतीतील हंबोल्ट पेंग्विन कक्ष उभारले आहे. या पेंग्विन कक्षाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच पाणपोई, प्रसाधन गृह, प्रशासकीय कार्यालय, फूड किऑस्क, कॅफेटेरिया, प्रेक्षागृह आदी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र दुसऱ्या टप्प्यात पालिकेने तब्बल १२० कोटींची कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत १७ पिंजऱ्यांची कामे अंतर्भूत असणार आहेत. कोल्हा, पाण मांजर, लांडगा, देशी अस्वल, मद्रास कासव, तरस, मांजर संकुल, बिबट्या, पक्षी पिंजरा व सर्पालय यासाठी १० पिंजरे / आवासस्थाने, तसेच वाघ, सिंह, सांबर, काकर, निलगायी, चौशिंगा, काळवीट व पक्षी पिंजरा असे ७ पिंजरे/ आवासस्थाने यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच या राणीच्या बागेत, सुरक्षा व दक्षता वाढविण्यासाठी ५.२० कोटी रुपये खर्चून नागरिकांना संबोधित करण्यासाठीच्या प्रणालीसह सीसीटीव्ही नेटवर्क विकसित करण्यात येणार आहे. राणी बागेत निर्माण होणारा सेंद्रिय कचरा संपूर्णपणे उपयोगात आणण्यासाठी विद्यमान गांडूळ खत प्रकल्पाची २.२० कोटी रुपये खर्चून दर्जोन्नती करण्यात येणार आहे. तसेच राणी बागेतील विद्यमान कार्यालय पाडून त्याजागी ७.८० कोटी रुपये खर्चून, 'लॅन्डस्केप' उद्यानाचे काम हाती घेण्यात येणार आहे.