मुंबई - विरोधी पक्ष वैफल्यग्रस्त असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला असून, विरोधक नव्हे तर सरकारच निराशेने आणि भयाने ग्रासल्याचे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले होते. सोमवारी सकाळी विखे पाटील यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, या सरकारची सर्वच आघाड्यांवरील कामगिरी शून्य आहे. त्यामुळे अधिवेशनात विरोधी पक्ष आपल्याला घेरणार, याची जाणीव त्यांना अगोदरच झालेली आहे. त्यामुळेच नेमके अधिवेशनाच्या दोन दिवस अगोदर सरकारला बोंडअळी व तुडतुडाग्रस्त शेतकऱ्यांना मदत निर्गमित करण्याचा आदेश काढणे भाग पडले. गेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दोन दिवस पूर्वी सरकारने शनिवारी व रविवारी बॅंका उघड्या ठेवून कर्जमाफीचे पैसे वितरीत करायला सुरूवात केली होती. विरोधी पक्ष आपल्याला कोंडीत पकडणार, याची कल्पना आल्यानेच सरकारला शेवटच्या क्षणी हे निर्णय घ्यावे लागतात, यावरून घाबरलेले कोण आहे? हतबल कोण आहे? याची जाणीव होते, असा टोला विखे पाटील यांनी लगावला.