Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

महापालिका अर्थसंकल्प कॉपी पेस्ट - कप्तान मलिक


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या सन २०१८ - १९ च्या अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी कोणताही नवीन संकल्प नसून मुंबईकरांच्या अपेक्षांवर पाणी फेरण्याचे काम केले गेले आहे, पालिका अधिकाऱ्यांनी मागील वर्षाचा अर्थसंकल्प उचलून कॉपी पेस्ट करण्याचा भोंगळ कारभार करून आपले हात झटकण्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी आज सभागृहात अर्थसंकल्पावर बोलताना केला.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात पालिका रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णामध्ये विभागणी करताना मुंबईकरांसाठी २० टक्के तर मुंबई बाहेरून येणाऱ्या रुग्णांना ३० टक्के वाढीव दर आकारण्याचे ठरविले आहे. मुळात मुंबई बाहेरून येणारा रुग्ण हा विरार - वसई, डोंबिवली बदलापूर तसेच नवी मुंबईतुन येतो. प्रत्यक्षात मुंबईतून नाईलाजास्तव मुंबई बाहेर फेकला गेलेला मराठी माणूस हा मूळ मुंबईकरच आहे. मात्र शिवसेनेने याच मराठी माणसाला १० टक्के अतिरिक्त वाढीव दर आकारून त्यांची क्रूर चेष्टा केल्याचा आरोप कप्तान मलिक यांनी यावेळी केला. प्रत्येक वर्षीच्या अर्थसंकल्पात मिठी नदी सुधारण्याच्या नावाखाली निधीची तरतूद केली जाते. मात्र मिठी नदी वाचविण्याची पालिका प्रशासनाची खरोखर इच्छा असेल तर सर्वप्रथम मिठी नदीमध्ये घाण सोडणाऱ्या कारखान्यांना टाळे ठोकण्याची गरज आहे. अन्यथा करोडो रुपये खर्च करून सुद्धा मिठी नदीत सुधारणा होणे अशक्य असल्याचे मलिक यांनी सांगितले. मुंबई महापालिकेकडून पालिका विद्यार्थ्यासाठी सुमारे विविध कारणांसाठी सुमारे २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे यामध्ये टॅब साठी १८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे टॅब देण्याची आवश्यकता आहे. असे न झाल्यास टॅबची घोषणा सुतळी बाँम्ब सारख्या फुसक्या ठरतील अशी सत्ताधाऱ्यांची खिल्ली मलिक यांनी उडवली. मुंबई महापालिकाकडून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी कामचोर ठेकेदारांना कंत्राट दिल्याचे त्यांनी सांगितले. जकात बंद झाल्यानंतर विकास नियोजन पालिकेच्या महसुलात मोठी घसरण झाली आहे त्यामुळे पालिकेला पहिल्यांदाच राखीव निधीचा वापर करण्याची गरज पडली असल्याचे सांगत मलिक यांनी सत्ताधाऱ्यांना पालिकेची जबाबदारी झेपत नसल्याची टिका केली. आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमाला मदतीची आवश्यकता असताना पालिकेकडून त्यांना कोणतीही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. मुंबईतील कचरा उचलण्यासाठी पालिका १८०० कोटी रुपये खर्च करते मात्र बेस्टला देण्यासाठी पालिका हात आखडता घेते. बेस्ट कामगारांपेक्षा कचऱ्यावर जास्त खर्च केला जात आहे असा आरोप मालिका यांनी केला. भाडेतत्वावर बस चालवून बेस्टमध्ये खाजगीकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom