Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

धोकादायक झाडांवर धोक्याचे फलक लावा - आयुक्त


मुंबई - मुंबईत पावसाळ्यादरम्यान झाडे पडण्याच्या घटना घडतात. गेल्या वर्षभरात झाडे पडून तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या कडेला असणा-या झाडांची पुनर्पाहणी करण्यात यावी. तसेच ही पाहणी करत असताना धोकादायक झाड असल्यास त्यावर धोक्याचा इशारा असलेला फलक लावण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले.

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनात महापालिका अधिका-यांची मासिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत खाजगी, शासकीय, निमशासकीय परिसरातील झाडांची निगा घेण्याची सर्व जबाबदारी ही संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असते. पावसाळ्याच्या काळात झाडे पडून वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन याबाबत सर्व संबंधितांनी महापालिकेच्या पूर्व परवानगीने आपल्या परिसरातील वाढलेल्या झाडांच्या फांद्या पावसाळ्यापूर्वीच छाटाव्यात, असे आवाहन महापालिकेद्वारे यापूर्वीच करण्यात आले. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची पावसाळ्यापूर्वी पाहणी करण्यात आली. तसेच या पाहणीदरम्यान धोकादायक परिस्थितीत आढळून आलेल्या झाडांबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणण्यात आले. यावेळी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या कडेला असणा-या झाडांची पुनर्पाहणी करण्यात यावी.तसेच ही पाहणी करत असताना खाजगी आवारातील जी झाडे रस्त्यांच्या बाजूने धोकादायक पद्धतीने झुकलेली आहेत, अशा झाडांवर देखील "झाड धोकादायक स्थितीत असून त्याखील कोणीही थांबू नये'', असे धोक्याचा इशारा असलेले फलक बसविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. उद्यान खात्यातील अधिकारी व कर्मचा-यांनी याबाबत मोहीम हाती घ्यावी व ती पुढील १५ दिवसात पूर्ण करावी असे आदेशही आयुक्तांनी दिले. .

मुंबईमधील सध्याची झाडांची आकडेवारी - 
वृक्ष गणनेनुसार महापालिका क्षेत्रात एकूण २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत. यापैकी १५ लाख ६३ हजार ७०१ एवढी झाडे खाजगी आवारांमध्ये आहेत. तर ११ लाख २५ हजार १८२ एवढी झाडे शासकीय परिसरांमध्ये आहेत. याव्यतिरिक्त १ लाख ८५ हजार ३३३ झाडे ही रस्त्यांच्या कडेला असून उर्वरित १ लाख १ हजार ६७ एवढी झाडे विविध उद्यानांमध्ये आहेत.

डोंगर उतारावरील वस्त्यांबाबत -
महापालिका क्षेत्रातील डोंगर उतारावरील वस्त्यांबाबत दरडी कोसळण्याचा धोका असतो. अशाठिकाणी सतर्कतेचा इशारा देणारे फलक लावावेत. तसेच सदर ठिकाणी जनजागृतीसाठी संवाद कार्यक्रम राबवण्याचे आदेश सदर बैठकीत देम्यात आले आहेत.

१२० शाळांमध्ये आकस्मिक निवारा - 
पावसाळयात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. अशी परिस्थिती महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये प्रत्येकी ५ शाळा, याप्रमाणे एकूण १२० शाळा आकस्मिक निवारा म्हणून घोषित कराव्यात. या सर्व शाळांच्या दर्शनी भागावर सदर शाळा ही आपत्कालिन परिस्थितीत आकस्मिक निवा-यासाठी असल्याचा फलक लावावा. त्याचबरोबर या फलकावर शाळेच्या संबंधितांचे नाव व संपर्क क्रमांक नमूद करावा; जेणेकरुन आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महापालिकेच्या कर्मचा-यांना संबंधितांशी संपर्क साधता येईल असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom